अमृता ढालकर
न्यू यॉर्कमधील स्कोन फाउंडेशन अभिलेखपालांचा त्यांच्या अभिलेखागारांमधील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान करते. २०१० मध्ये खादेर सलामेह आणि यहोशुआ फ्रॉइंडलिक यांना हा सन्मान संयुक्तपणे दिला गेला. हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर न्यू यॉर्क टाइम्सने ‘अभिलेखपाल आजचे शांतिदूत आहेत का?’ अशा मथळ्याचा लेख छापला. कारण खादेर सलामेह हे जेरुसलेम येथील अल-अक्सा मशिदीच्या ग्रंथालयाचे प्रमुख, आणि यहोशुआ फ्रॉइंडलिक – इस्रायल स्टेट आर्काइव्हचे प्रतिनिधी. आत्ताच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, या सन्मानाचे महत्व आणखी ठळकपणे जाणवतं. पुरस्कार स्वीकारताना या अभिलेखापालांनी एक गोष्ट नमूद केली – ‘शांतता प्रस्थापित करायची असेल तर एक समान धागा हवा, एक सामायिक कहाणी हवी, परंतु तशी कहाणी जन्माला यायला शांति असावी लागते, आणि शांति मिळायला अशी एक कहाणी लागते.’ स्टॅनली कोहेन या स्कॉन फोंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष यांनी हे अधोरेखित केलं की संघर्षाच्या काळात मतभेद आणि संदिग्धता वाढीस लागते. अभिलेखांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. अभिलेख हे केवळ माहितीचा स्रोत नसून परस्पर विश्वास निर्माण करणारे आणि सहकार्याची दिशा दाखवणारं माध्यम ठरू शकतं.
पण अभिलेख म्हणजे नक्की काय? अभिलेख म्हणजे जुन्या नोंदी, दस्तऐवज, छायाचित्र, चित्रफीत, नकाशे अशी इतिहासाची साधने! हे फक्त प्रशासकीय कागद नाहीत, तर आपला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास. अभिलेखागार खर तर फक्त जेत्यांच्या नाही तर जनसामान्यांचा इतिहास जपून ठेवते. अशा ऐतिहासिक पुराव्यांचे संकलन करून, संवर्धन करते. १८२१ च्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागाराची स्थापना झाली, बॉम्बे रेकॉर्ड्स ऑफिस अस त्याच तत्कालीन नाव. स्वातंत्र्यानंतर नागपूर, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर येथे विभागीय कार्यालय निर्माण केली गेली. या सगळ्या ठिकाणी मिळून मराठ्यांच्या इतिहासासंबंधीची, पेशवाई, निजामशाही, अशा वेगवेगळ्या कालखंडातील आणि आमदानीतील दस्तऐवज आहेत. मराठी, दख्खनी, फारसी, इंग्रजी या भाषांमधील आणि महत्त्वाचे म्हणजे विविध लिप्यांमधले अभिलेख इथे जतन केलेले आहे. तसेच तब्बल दहा हजारहून जास्त नकाशे आहेत.
महाराष्ट्र राज्य पुरभिलेखगाराप्रमाणे भारतात अशी अनेक अभिलेखागारे हा ऐतिहासिक अभिलेखांचा संचय जपून ठेवत आहेत. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार अनमोल दस्तऐवजांचे जतन करत, दिल्लीचे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA) हे भारतीय लोकपरंपरा, कला आणि तोंडी इतिहासाचे (ओरल ट्रेडिशनस एंड हिस्ट्री) अभिलेख संकलित करते, तर राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार, पुणे येथे जुने चित्रपट, पटकथा आणि छायाचित्रांचा मोठा संग्रह आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अभिलेख भारतातील प्राचीन इतिहासाशी संबंधित आहेत. विविध राज्यांची अभिलेखागार तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉफिजिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास येथेही संस्थात्मक अभिलेखागार आहेत.
भारताचे सध्याचे पंतप्रधान हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेले पहिले पंतप्रधान आहेत. यापुढील या पदावर येणारी व्यक्तीही स्वतंत्र भारतात जन्माला आलेली असेल. स्वातंत्र्यलढा पाहिलेली – अनुभवलेली, फाळणी मधे होरपळलेली, स्वातंत्र्य मिळाल्याच रेडिओ वर ऐकलेली, भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचं भाषण वृत्तपत्रात वाचलेली एक पिढी आता काळाआड होत आहे. जसे स्वातंत्र्यलढ्याच्या प्रशासकीय नोंदी आहेत एक खूप मोठा आठवणींचा संचय या पिढीकडे होता, या सगळ्या काळाचे विविध पैलू दाखवणारा. याच विचारातून पार्टीशन म्युझियम (अमृतसर) ने फाळणीच्या वेदना, विस्थापन, हिंसा, आणि पुन्हा नव्याने उभारल्या गेलेल्या आयुष्याची कहाणी सांगणारं एक अभिलेखागार सुरू केल आहे. इथे जुनी छायाचित्रे, कुटुंबातील वस्तू, पत्रव्यवहार अशा बऱ्याच गोष्टींचा संग्रह आहे.
आपण मराठ्यांच्या ऐतिहासिक साधनांकडे, स्वातंत्र्य चळवळीच्या अभिलेखांकडे, या विभाजन काळातील पिढीच्या इतिहासाकडे, प्रशासकीय नोंदींकडे पाहतो तसंच समकालीन इतिहासही जपणे गरजेचे आहे. अजून शंभर वर्षांनी आत्ताच्या काळाचा अभ्यास करताना कुठले ऐतिहासिक संदर्भ वापरले जातील? पॅलेस्टाईन-इस्रायलसारखे संघर्ष, कोविडसारख्या आपदा, राजकीय स्थित्यंतरं आणि त्याचे परिणाम, हवामान बदलाचे परिणाम आणि त्यामुळे निर्माण होणारे संघर्ष, याचा इतिहास कुठल्या अभिलेखांच्या आधाराने लिहिला जाईल? आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचे असेल तर आपण कुठून आलो हे माहीत असणे अपेक्षित आहे. याच बरोबरीने अज्ञात, दुर्लक्षित इतिहासाकडे, धोक्यात आलेल्या अशा समूहांचा/ व्यक्तींचा किंवा गोष्टींचा इतिहास जपल्याने, आपली वाटचाल भविष्य-वेधी होऊ शकते. दुर्लक्षित किंवा काळाच्या पडद्याआड गेलेले कलाकार, आदिवासी किंवा विविध जाती-जमातींचा आवाज शोधायला, साठवायला हवा.
मायकल ब्रुक्स वयाच्या ८२व्या वर्षापर्यंत दुर्लक्षित संगीतकारांच्या ध्वनिमुद्रिका शोधत, त्याच डिजिटायजेशन करून, जपत आणि संवर्धन करत राहिला. ‘ऑफुल’ कामालाही इतिहासात महत्व आहे. सुरात आहेत का नाही हे बघण्याची ही वेळ नाही. प्रत्येक आवाज (रिकॉर्डिंग) हा जतन करण्यासारखा आहे, असं त्यांच म्हणणं होत. रेबेका क्लासेनने न्यू यॉर्क हिस्टॉरिकल सोसाइटीच्या माध्यमातून कोविडच्या घडामोडींचं दस्तऐवजीकरण केल. सॅनिटाइजरच्या बाटल्या, मास्कमागील कहाण्यांचा खूप मोठा संग्रह केला, वैयक्तिक जर्नल्स गोळा केली. या संकटाला आपल्या समाजाने कसं तोंड दिलं याची कहाणी या संग्रहात आहे. ऑस्ट्रेलियाच्या लॉरिस ॲलेन विल्यम्स यांनी अबॉरिजिनल तसेच टॉरीस आयलँडर समूहाच्या मानवी हक्कांसाठी कार्य केलं. कुटुंबांचा इतिहास, त्यांची ओळख आणि अस्मिता जपायची असेल तर त्यांचे अभिलेख जपणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्या त्यांच्या समूहातील, शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या पहिल्या अभिलेखपाल होत्या. त्यांनी ‘मास आब्ज़र्वेशन अर्काइव्ह’च्या स्थापनेतून सामान्य लोकांच्या जीवनाचे दस्तऐवजीकरण केले.
तमारा लॅनियर यांनी २०१९ मध्ये हार्वर्ड विद्यापीठावर एक खटला दाखल केला होता. हार्वर्ड विद्यापीठाच्या संग्रहामध्ये १५ डग्युरिओटाइप्स (छायाचित्र तयार करायची एक शैली) छायाचित्र होती, ज्यामध्ये तमाराच्या पाच पिढ्यांआधीचे पूर्वज होते. आणि हे फोटो गुलामगिरीच्या काळातील होते. ‘फ्री रेंटी’ (रेंटी हे त्या फोटोमधील व्यक्तीचे नाव) या चळवळीवर विशेष लेखमालिकाही प्रकाशित झाल्या. मागच्या आठवड्यात हार्वर्ड विद्यापीठाने हे फोटो परत देण्याचे मान्य केले. तमारा यांच्या मते इंटरनेशनल आफ्रिकन अमेरिकन संग्रहालय हे या छायाचित्रांसाठी योग्य ठिकाण राहील, जिथ त्यांचं जतन संवर्धन होईल.
भारतातून तसेच पारतंत्र्याच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या इतर अनेक देशांचा ऐतिहासिक ऐवज वसाहतवादी देश परत जाताना घेऊन गेले. आजही लंडनमध्ये अतिशय महत्त्वाचे अभिलेख हे तिथल्या संग्रहालय-ग्रंथालय-अभिलेखागारांच्या संचयाचा मोठा भाग आहेत. वसाहतवादामुळे एकांगी इतिहास लेखन झाले होते. या अभिलेखांचे ‘डिकॉलोनिजेशन’ करायचे असेल तर त्यांच्या मूळ संदर्भात पुनर्व्याख्या करणे, मूळ देशात परत आणणे किंवा स्थानिकांच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्व विशद करणे, हे न्यायसंगत होईल. कम्युनिटी अर्काइव्ह स्कॉलर डॉ. मिशेल कासवेल म्हणतात, अभिलेख परत करून वसाहतवाद संपणार नाही, अभिलेख संचय हा त्याच्या मूळ संदर्भात जतन करून, स्थानिकांच्या स्वतःचा आवाज मिळवून देणे होय. येत्या काळात, अभिलेखापालांची ही एक मोठी जबाबदारी असेल.
भारतामध्ये स्थानिक लोकांच्या, आदिवासी समाजाच्या दृष्टीने समकालीन इतिहासाचे विविध मार्गाने दस्तऐवजीकरण चालू आहे. नंदिनी ओझा यांनी सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी आणि गावकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. या प्रकल्पामुळे त्यांच्या जीवनावर झालेले दूरगामी परिणाम ‘उनकी जुबानी’ ऐकायला मिळतात. या मुलाखतींचा संग्रह ‘ओरल हिस्ट्री नर्मदा’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी ‘पीपल्स आर्काइव ऑफ रूरल इंडिया’ च्या माध्यमातून सत्तर-ऐंशी कोटी देशवासींच्या कहाणीमधून ग्रामीण भारताचा खरा चेहरा समोर आणला. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, महिला, मच्छीमार, आदिवासी आणि त्यांचं पारंपरिक ज्ञान जतन केल, चित्रफिती बनवल्या, लेख, गाणी, ओरल हिस्ट्री असे अभिलेख तयार करून तब्बल १५ विविध भाषांमधून PARI च्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जाते. हे अभिलेखागार प्रशासकीय परिघाबाहेरचा दुर्लक्षित इतिहास, कथा आणि अनुभव समोर आणते आहे. हा आहे सामान्य माणसाचा असामान्य इतिहास!
प्रशासकीय, समकालीन तसेच डिजिटल या अशा विविध माध्यमांमधून अभिलेख उपलब्ध आहेत. महसूल खात्याचे सात-बारा, भूमिअभिलेख मधले कागदपत्र, जन्म मृत्यूच्या नोंदी, आरोग्य योजनेच्या नोंदी ही आणि अशी सगळी सरकार दरबारी असणारी कागदपत्र हा आपला जनसामान्यांचा इतिहास आहे. फक्त या साहित्याचा वापर एका विशिष्ट कारणासाठी होतो, त्यामुळे त्यामागील अभिलेख-मूल्य आपल्याला लक्षात येत नाही. या अभिलेखांच्या माध्यमातून आर्थिक-राजकीय-सामाजिक इसिहास, सांस्कृतिक वारसा, सामान्य माणसाचा आवाज जपला जाणं, हेच लोकशाहीचं सौष्ठव आहे.
१९४८ साली, चार्ल्स समारन, फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखागाराचे तत्कालीन संचालक, यांच्या अध्यक्षतेखाली युनेस्कोच्या मदतीने ‘इंटरनेशनल काउन्सल ऑन अर्काइव्ह’ ची स्थापना झाली. जगभरातील अभिलेखापालांसाठी एक व्यासपीठ मिळालं. २००७ साली झालेल्या इंटरनेशनल काउन्सल ऑन अर्काइव्ह संमेलनात ९ जून रोजी अभिलेख/ अभिलेखागार दिवस साजरा करायचं ठरवलं गेलं – समाजातील अभिलेखांचं आणि अभिलेखगारांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी. हाच दिवस निवडला कारण १९४८ मध्ये याच दिवशी काउन्सलची स्थापना झाली होती. या दिवशी विविध देशांत अभिलेखागारांमध्ये कार्यक्रम, प्रदर्शनं, चर्चासत्रं आणि कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. ज्यातून जनसामान्यांमध्ये अभिलेखांच्या उपयोगाबाबत जनजागृती केली जाते.
आता याच दिनाचे औचित्य साधून आपण आपली पावलं आपण अभिलेखागारांकडे वळवुया. प्रत्यक्ष अभिलेखागारात किंवा संकेतस्थळांवर जाऊन विविध अभिलेख अभ्यासूया. घराघरांमध्ये जुनी पत्रं, आजी-आजोबांच्या पाककृतींपासून ते हिशोबाच्या वह्यांमधून दिसणारा तत्कालीन जीवनमानाचा अभिलेख जतन करूया. मला कुठे संशोधन करायचे आहे, असं न म्हणता या संग्रहांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सामान्य लोकांनी अभिलेखागारांकडे आपली पावलं वळवली, शास्त्रशुद्ध पद्धतीने आपला दस्तऐवज वाचला, तर अस्मितांच्या राजकारणात होरपळून निघणं थांबेल. लोकशाहीवादी पोषक चर्चा होऊ शकतील, हा आशावाद! असे झाल्यास येणाऱ्या काळात अभिलेखपालच शांतिदूत आहेत या कहाण्या आपण सांगू शकू.
अभिलेखागार आणि संग्रहालयशास्त्र अभ्यासक
amrutadhalkar@gmail.com