डॉ. रवींद्र यशवंत श्रीखंडे
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले हे गीत महाराष्ट्राचे गौरवगीत म्हणून ओळखले जाते. हे गीत किर्लोस्कर मासिकात १९२६ साली प्रसिद्ध झाल्याची माहिती मिळते. या गीताला पहिली चाल शंकरराव व्यास यांनी लावली. विस्मृतीत गेलेली ती सुरेल चाल ज्योत्स्ना भोळे यांच्या मुख्य स्वरात यूट्यूब वर ऐकायला मिळते. परंतु माझ्या लहानपणापासून कानावर नेहमी पडायची ती चाल भालजी पेंढारकर यांच्या त्यावेळच्या सर्व बोलपटांतील श्रेयनामावलीत वाजणाऱ्या या महाराष्ट्र गौरव गीताची.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

भालजींच्या सुरुवातीच्या चित्रपटात हे गीत समूहस्वरात असायचे. १९५० ते १९५२ या कालावधीत भालजींच्या विविध चित्रपटांचे संगीतकार लक्ष्मण बेरळेकर, दत्ता डावजेकर, सी. रामचंद्र असले तरीही हे गीत मात्र कायम असे. चित्रपट माध्यम, मान्यवर गायक, विविध संस्मरणीय प्रसंगी झालेला वापर अशा कारणांमुळे ही चालच प्रचलित आहे. त्यामुळे या गीताचे संगीतकार कोण असा प्रश्न मनात आला. या गीताची स्वतंत्र ध्वनिमुद्रिका निघाली नसावी. त्यामुळे नक्की चाल कोणाची, हे कळण्यास मार्ग नव्हता. या कुतूहलाचा पाठपुरावा करताना १९४७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय भवानी’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत हेच गीत आढळले. संगीतकार होते- सी. बालाजी अर्थात बाळाजी चौकुले. १९३७ सालापासून सी. बालाजी भालजींच्या अनेक चित्रपटांत सुरुवातीला गोविंदराव टेंबे यांचे सहाय्यक व नंतर स्वतंत्र संगीतकार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सी. बालाजी यांनी या गीताला संगीत दिले असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

त्यानंतरच्या काळात आनंदघन अर्थात लता मंगेशकर यांनी भालजी पेंढारकर यांच्या चार चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी हे गीत मंगेशकर भावंडांच्या समूहस्वरात पुन्हा ध्वनिमुद्रित करून श्रेयनामावलीसाठी वापरले. तसेच लता मंगेशकर यांनी हे गीत १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या प्रसंगी झालेल्या सोहळ्यात पंडित नेहरूंच्या उपस्थितीत गायले होते. १९८९ मध्ये पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या व्यासपीठावरून सर्व भगिनींच्या साथीने आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पुन्हा लतादीदींनी हे गीत सादर केले होते. पुढे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमांत हे गाणे लता मंगेशकर यांच्याच आवाजात ऐकण्याची संधी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळाली होती.

परिणामी बहुसंख्य श्रोत्यांत तसेच काही जेष्ठ संगीतकारांत असा समज आढळून आला की लता मंगेशकर यांनीच हे संगीत दिले आहे. परंतु उपलब्ध ध्वनिचित्रफिती आणि कालक्रम दोन्हींचा विचार केला तर असे झाले असणे संभवत नाही.सी. बालाजी किंवा अन्य कोणीही असो, मूळ संगीतकाराला त्याचे श्रेय मिळाले पाहिजे, असे मला वाटते. भालजी पेंढारकर यांच्या ‘साधा माणूस’ या आत्मचरित्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. सध्या कार्यरत असणाऱ्या संगीत क्षेत्रातील काही मंडळींकडून, व्यासंगी रसिकांकडून, संगीताला वाहिलेल्या समूहांकडून निश्चित माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून निश्चित उत्तर मिळाले तर मला आनंद होईल.

महाराष्ट्राचे गोडवे गाणाऱ्या बहुसंख्य गेय रचनांतील समान धागा म्हणजे त्यांच्यामागे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, संतांच्या उपदेशांची, मराठीच्या थोरवीची आणि महाराष्ट्राच्या भूवैविध्याची प्रेरणा. बहुतांश गीतांनी ही वैशिष्ट्ये अधोरेखित केली आणि महाराष्ट्राविषयीचा अभिमान जागविला.

‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या महाराष्ट्र गौरव गीताची रचना विनोदी निबंधकार, नाटककार, कवी, वाङ्मय समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात, जेव्हा महाराष्ट्राला राज्याची ओळखही मिळालेली नव्हती, त्या काळात कोल्हटकरांनी ही रचना केली. येथील मातीची, मराठी भाषा आणि संस्कृतीची महती शब्दबद्ध केली. दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांची ‘महाराष्ट्र भूपाळी’, गोविंदाग्रजांचे ‘प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’, राजा बढे यांनी रचलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ या गीतांनी कोल्हटकर यांची परंपरा पुढे सुरू ठेवली. ‘बहु असोत सुंदर…’ महत्त्वाचे ठरते ते त्यामुळे.

doc_shrikhande@yahoo.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On 1st may maharashtra day composed the melody of our state anthem sud 02