ॲड्. बळवंत रानडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंश हा वृद्धावस्थेत नकोसा वाटणारा असा आजार आहे. त्यात मेंदूची कार्यक्षमताच कमी होते. त्यामुळे विसरभोळेपणा वाढत जातो. फ्रीजचे दार कशासाठी उघडले हे न आठवणे, निरोप विसरणे, घराच्या किल्ल्या कोठे ठेवल्या आहेत हे न आठवणे, चष्मा डोळ्यावर असूनही घरात सर्वत्र शोधणे, वस्तू सापडत नाही म्हणजे ती कोणीतरी नेली आहे असे सारखे वाटणे, बोलण्याचा अर्थच न समजणे, लिहिताना चुका होणे, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे, फोनवर नको असलेली माहिती देणे आणि गुप्त माहितीदेखील उघडपणे सांगणे, अव्यवस्थित कपडे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष, सामाजिक जीवनातून निवृत्त होणे, कोणामध्येही मिसळणे नको वाटणे, एकटेपणात गुंग राहणे, सतत कोणती ना कोणती तरी भीती, निराशा वाटत राहणे, काळजी करणे, मनाविरुद्ध गॊष्टी झाल्यास संताप व्यक्त करणे, सतत आदळआपट अशा अनेक गोष्टींमधून स्मृतिभ्रंश झालेली माणसे लगेच ओळखून येतात. माणसाचा मेंदू, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या सारख्या पंचेंद्रियांमार्फत माहिती गोळा करून ती साठवून ठेवतो. हे कार्यच या आजारात मंदावते. तरुणपणी मेंदूत साठविलेली माहिती गरजेनुसार पुरविली जाते. तरुणपणी हे सर्व अगदी सहजपणे होते. वृद्धपणी अनेकांना आपल्या लहानपणीची माहिती आठवते. परंतु कांही दिवसापूर्वी घडलेल्या घटना विस्मरणात जातात. भेटलेली व्यक्ती, स्थळ पाहिलेली घटना मेंदूत साठवून ठेवण्याची प्रक्रियाच मंदावते. माणसाचा मेंदू ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. एका क्षणात लाखो घडामोडी मेंदूत घडत असतात. माणसाची विचार करण्याची प्रक्रियाच थंडावते. यातूनच स्मृतिभ्रंशाची सुरुवात होऊन पुढे अल्झामायरच्या दिशेने वाटचाल सुरु होते. माणसाची विचार करण्याची क्षमता, आठवणीत ठेवणे आणि त्याचे नेहमीचे आचरण यामधून या आजाराची लक्षणे ओळखून येतात.

जपानमधील टोकियो येथील एक अनिवासी भारतीय महिला आपल्या जुन्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी पुण्यात आली. तिच्या मुलाने नारिता या टोकियो येथील विमानतळावर तिला निरोप दिला. पुणे विमान तळावरून मित्राने आपल्या फ्लॅटवर आणले. दुसऱ्या दिवशी सदर महिला बागेत फिरण्यासाठी एकटीच बाहेर पडली. कोणत्या इमारतीमधून आपण आलो आहोत हेच ती विसरली. वय होते ७६ वर्षाचे. घराचा रस्ताच सापडेना. पुण्यातील आपल्या मित्राचा तसेच जपानमधील मुलाचा फोननंबर देखील आठवेना. अखेर पोलिसांची मदत घेऊन शोध करावा लागला. विस्मरण ही अत्यंत धोकादायक घटना असून दैनंदिन जीवनात ती अनेक अडचणी निर्माण करू शकते.

हेही वाचा >>>वसाहतवाद विरोधी लढा सुरूच राहणार आहे…

वाढत्या वयामध्ये सुरू होणाऱ्या या आजाराचे रुग्ण शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सामान्यपणे ६५ वयाच्या १० माणसामध्ये एक असे स्मृतिभ्रंशाचे प्रमाण आढळून येते. हेच प्रमाण ८५ वर्षापुढील वय असलेल्यांमध्ये ४ पैकी १ असे सध्या दिसून येत आहे. देशात सध्या चार दशलक्षहून जास्त ज्येष्ठ नागरिक या आजाराने पछाडलेले आहेत. तसेच जगामध्ये सुमारे ४६.८ दशलक्षहून जास्त रुग्ण स्मृतिभ्रंशाचे शिकार झाले आहेत. आणखी २० वर्षांनी ही संख्या दुप्पटीहून जास्त म्हणजे ७५ दशलक्ष होण्याची शक्यता आहे. हेच प्रमाण वाढत जाऊन २०५० साली १३५ दशलक्ष हून जास्त जणांना या आजाराचे शिकार व्हावे लागणार आहे. हा आजार कशामुळे होतो हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. वृद्ध व्यक्तीमध्ये अचानक मेंदूत बदल होतो. आजार बरा करण्यासाठी कोणतेही ठोस रामबाण औषध संशोधकांना अद्याप सांपडलेले नाही. मेंदू आणि शरीरावर स्मृतिभ्रंशाचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास सुरू आहे. तरी देखील ‘योग’ साधना आणि चिंतन मनन तसेच ध्यान धारणा यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते.

हेही वाचा >>>यंदासारखी पाणीटंचाई टाळायची असेल, तर जलाशयांतील गाळ काढाच!

जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची सवय यामुळेही विसरभोळेपणावर अंकुश राहू शकतो. यामुळे सध्या केवळ लक्षणावरून आजाराचे निदान करता येते. विस्मरणाच्या या आजाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी माणसाच्या जीवनशैलीत सतत मेंदूला तरतरीत आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी नियोजनपूर्वन प्रयत्न करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, सात्विक अन्न, रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण, पडझड होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वृत्तपत्रातील शब्दकोडी सोडवणे, मुलांना शिकवणे हे देखील मेंदूला व्यायाम देणारेच आहे. मानसिक दडपणाखाली न राहणे, आत्मविश्वास ढळू न देणे, नवीन कल्पना मांडणे, सामाजिक संघटनांमधून आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करणे असे केल्याने स्मृतिभ्रंशाच्या आजाराला दूर ठेवता येते. माणसाचे एक महत्वाचे इंद्रिय म्हणजे डोळा. त्याची काळजी घ्यावी, त्याच्यावर ताण येईल असे कोणतेही काम करू नये. मंद प्रकाशात बारीक अक्षरे वाचणे तसेच सतत टी. व्ही. पाहणे या गोष्टी टाळाव्यात. डोळ्यावर पंजा ठेवून कान बंद करून ‘सुं…सुं’ असा आवाज करीत राहावे. तसेच डोळे मिटून शांत बसणे हा ‘योगा’चा एक चांगला प्रकार आहे, असे डॉ. आर्थर विंटर आणि श्रीमती रूथ विंटर या शास्त्रज्ञाना स्मृतिभ्रंशावरील संशोधनात आढळून आले आहे. ‘अ’ जीवनसत्व असलेल्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, जवस चटणी, अक्रोड, बदाम, मनुका, भिजवून खाणे उपयुक्त आहे. ओमेगा फॅट ॲसिड योग्य प्रमाणावर पोटात सतत जाईल असे पाहावे. याच बरोबर पोहणे, जॉगिंग, बागकाम, नृत्य, यामुळे मेंदूला व्यायाम मिळतो. यामुळे विस्मरणाची सवय थोड्या प्रमाणावर कमी होते असेही अभ्यासकांना आढळून आले आहे. टेनिस, गोल्फ, सायकलिंग यात मन गुंतविल्यास हा आजार कांही वर्षे पुढे ढकलला जातो.

विस्मृतीच्या आजारात मेंदूला सदैव कार्यरत ठेवणे हे सर्वात महत्वाचे म्हणजे आहे. मेंदूला कधीही निवृत्त करू नका. मानवी जीवनात सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास मेंदूचे कार्य पूर्णक्षमतेने सुरू राहून स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो.

लेखक ज्येष्ठांच्या समस्यांचे अभ्यासक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To prevent alzheimer in old age precautions should take early amy