बदलापूर : अनेक महिने रखडलेल्या बदलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. शुक्रवारी या योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. एकूण २४५ कोटी ८२ लाख रुपये खर्चातून ही योजना पूर्ण केली जाणार असून यात उपसा विहिरी, मुख्य जलस्त्रोत, जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उपसा यंत्रणा, जलकुंभ उभारण्यात येणार असून नव्या जलवाहिन्याही टाकण्यात येणार आहेत. राज्य सरकार आणि कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या माध्यमातून ही योजना मार्गी लागणार आहे.
परवडणाऱ्या घरांसाठी नोकरदार वर्गाच्या पसंतीला उतरलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात शेकडो इमारती उभ्या राहिल्या. त्यावेळी शहराची पाण्याची मागणी सुद्धा वाढली. सध्याच्या घडीला बदलापूर आणि अंबरनाथ शहराला विविध स्त्रोतांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. बदलापूर शहराला मुख्यतः उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवले जाते. मात्र सध्या शहराची लोकसंख्या पाहता पाण्याची मागणी मोठी आहे. त्याच वेळी पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या पाणी योजनेची गरज होती.
गुरुवारी बदलापूर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. शुक्रवारी याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत २४५ कोटी ८२ लाख ४४ हजार ३६३ रुपयांची ही पाणी योजना आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेला तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला होता. मात्र ही योजना प्रशासकीय मान्यतेसाठी रखडली होती. अखेर गुरुवारी या योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेमुळे बदलापूर शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. पुढील ३० वर्षांची पाण्याची तहान या योजनेमुळे भागली जाणार आहे.
योजनेत या कामांचा समावेश
नव्याने मंजूर करण्यात आलेल्या योजनेत दोन उपसा विहिरी आणि उपसा केंद्र उभारले जाणार आहे. सोबतच ६० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उचल आणि पुरवठा यंत्रणा, मुख्य जलस्त्रोत, १३ जलकुंभ यात उभारले जाणार आहेत. वालीवली येथे पाणी उपसा केंद्र उभारण्यात येईल. शहरभर सुमारे १२२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
प्रतिक्रिया: गेली तीन वर्षे या योजनेचा पाठपुरावा सुरू होता. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असाव्यात अशी माझी मागणी होती. अंबरनाथनंतर आता बदलापूरची योजना मंजूर झाल्याने दोन्ही शहरातील भविष्याची पाण्याची तहान भागणार आहे. – किसन कथोरे, आमदार, मुरबाड.
प्रतिक्रिया: बदलापूरसारख्या वाढत्या शहराला अतिरिक्त पाण्याची गरज आहे. हे ओळखून नव्या पाणी.योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर ही योजना मंजूर झाली असून ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. – वामन म्हात्रे, शहरप्रमुख, शिवसेना.