ठाणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मराठी बांधवांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी बॅनर झळकविले. ‘महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे’ असे या बॅनरवर म्हटले आहे.
या बॅनरवर केवळ दोन नेत्यांची छायाचित्रे नव्हती, तर ती एक भावना होती. एकतेची, बंधुभावाची आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची असे बॅनर फडविणाऱ्यांनी सांगितले. व्हिएतनाममधील तसेच जगभरातील मराठी माणसांचे हे आवाहन आहे की महाराष्ट्रात दोन प्रभावशाली नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असेही त्यांनी सांगितले. ज्या प्रकारे देशांतर्गत नागरिक या एकतेची अपेक्षा बाळगून आहेत, त्याचप्रमाणे परदेशातील मराठी बांधवही भावनिकरित्या आपल्या मातृभूमीशी जोडले गेले आहेत.
आजच्या काळात महाराष्ट्राला स्पष्ट दिशा, विकासाभिमुख नेतृत्व आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज आवश्यक आहे. जो केवळ ठाकरे बंधूंनी मिळूनच शक्य आहे. मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. राजकारणात भिन्नता असली तरी महाराष्ट्रासाठी एकवाक्यता हवी असेही त्यांनी सांगितले.