ठाणे : राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय या पक्षाची अथवा सरकारची बाराखडी देखील सुरू होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशातील उच्चपदस्थ नेतेही छत्रपतींना वंदन करताना दिसतात. मराठा आंदोलनाच्या यशस्वी हाताळणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाल्याच्या जाहीराती झळकल्या होत्या.
एकीकडे महाराजांच्या नावाने सर्वत्र जयघोष सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेकडे राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारणीसाठी पैसेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आरोप करत अनोखे आंदोलन केले.
ठाणे शहरात प्राणवायुचे प्रमाण वाढावे आणि नागरिकांना मनोरंजन आणि विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने हिरानंदानी मेडोज परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ ची निर्मिती केली आहे. या उद्यानात विविध प्रजाचीची एक हजार झाडांची लागवड, ७५ वर्ष जुन्या वड आणि पिंपळ झाडांचे जतन आणि शंभरहून अधिक औषधी वनस्पतीची उद्यानात लागवड करण्यात आली आहे.
उद्यानात चालण्यासाठी मार्गिका, योगा आणि व्यायाम करण्यासाठी व्यवस्था, बांबू पथ, छोट्या तलाव सौदर्यीकरण, अशी कामे करण्यात आली आहेत. या उद्यानाचे दिवाळीच्या पहिल्या दिवशी उदघाटन करण्यात आले. पण, या उद्घाटनादरम्यान राज्यातील महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेच्या सेनेत नाराजी नाट्य रंगल्याचे दिसून आले.
उद्यानाला जिजाऊंचे नाव
ठाणे येथील पोखरण क्रमांक दोन भागातील हिरानंदानी मेडोज परिसरात पालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात राजमाता जिजाऊ यांचा पुतळा होता. या उद्यानाचे नुतनीकरण करताना तो काढण्यात आला. नुतनीकरणानंतरही पुतळा बसविण्यात आलेला नाही. तसेच या उद्यानाचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा होती.
यातूनच मराठा मोर्चा आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी रमेश आंब्रे यांचे उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी वादही झाले होते. यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह आंब्रे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती. यावेळी राजमाता जिजाऊ यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पालिकेने या उद्यानाला जिजाऊ यांचे नाव दिले आहे.
जिजाऊंचा पुतळा उभारणीसाठी पैसे नाहीत
हिरानंदानी मेडोज परिसरात पालिकेने विकसित केलेल्या उद्यानाला राजमाता जिजाऊ प्राणवायू उद्यान असे नाव दिले आहे. असे असले तरी या उद्यानात राजमाता जिजाऊ यांचा पुतळा पुन्हा बसविण्यात आला नसल्यामुळे सोमवारी उदघाटनाच्या दिवशी राज्यातील महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेच्या सेनेत नाराजी नाट्य रंगल्याचे दिसून आले. ठाणे पालिकेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी राजमाता जिजाऊ प्राणवायु उद्यानाचे उद्घाटन केले.
परंतु या आधी भाजपचे पदाधिकारी रमेश आंब्रे यांनी जिजाऊंचे तैलचित्र उद्यानात ठेवून या उद्यानाचे उद्घाटन उरकून घेतले. राजमाता जिजाऊ यांचा पुतळा बसविण्यासाठी पैसे नसल्याचे आयुक्तांनी आम्हाला सांगितले होते. त्यामुळे आमदार निरंजन डावखरे यांनी स्वखर्चातून राजमाता जिजाऊ यांचे तैलचित्र घेतले. हे तैलचित्र उद्यानात बसवून प्रशासनाचा निषेध नोंदवून उद्यानाचे उद्घाटन केले, अशी प्रतिक्रिया रमेश आंब्रे यांनी दिली. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.