लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : रस्ते आणि पदपथ अडवून अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच सिलिंडर, ज्वलनशील पदार्थ सार्वजनिक ठिकाणी ठेऊन नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात ठाणे पोलिसांनी आता भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. महिन्याभरात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ४ हजारहून अधिक फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना वाहतुकीस अडथळा सहन करावा लागत होता. महापालिका कर्मचाऱ्यांचा फेरीवाल्यांवर वचक राहिला नसल्याने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचा बडगा उचलावा लागत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. त्यामुळे दररोज शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी शहरांतील अंतर्गत रस्ते अद्यापही अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी होत असते. त्यातच रस्त्यांकडेला आणि पदपथ अडवून फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांमुळे कोंडीत भर पडत आहे. काही फेरीवाले ज्वलनशील वस्तू, सिलिंडर सार्वजनिक ठिकाणी ठेऊन व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवीताचा धोका देखील निर्माण झाला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या संदर्भात कारवाईच्या सुचना वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

आणखी वाचा-ठाणे : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

त्यानुसार, नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुक कोंडी होत असल्याने ठाणे पोलिसांनी भारतीय दंड संहिता २८३ आणि २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार २३५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ठाणे ते दिवा आणि भिवंडी क्षेत्रात २ हजार ४२१ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. तर, डोंबिवली ते बदलापूर क्षेत्रात १ हजार ८१४ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर फेरीवाल्यांना न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर त्याला दंड आकारला जात आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधिकारी तेथील जागेचा पंचनामा करतात. महापालिकांच्या दुर्लक्षामुळे पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे. -डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग.

शहरे दाखल गुन्हे
ठाणे ते दिवा ( परिमंडळ एक आणि पाच)२३८६
भिवंडी (परिमंडळ दोन)३५
डोंबिवली, कल्याण (परिमंडळ तीन) ८९१
उल्हासनगर ते बदलापूर (परिमंडळ चार)९२३
एकूण४२३५
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases have started to be registered against hawkers more than 4000 cases have been registered within a month mrj