कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात सात ते १० वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या तीन अभियंत्यांची आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घनकचरा, पाणी विभागात बदली केल्याने समपदस्थ अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नगररचना विभागातून आपली बदली केल्याने एक अभियंता बदली आदेश न स्वीकारताच आजारपणाच्या रजेवर निघून गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नगररचना विभागातील उपअभियंता महेश डावरे, साहाय्यक अभियंता दीपक मोरे, उपअभियंता उदय सूर्यवंशी अशी बदली झालेल्या अभियंत्यांची नावे आहेत. उपअभियंता डावरे १० ते ११ वर्ष नगररचना विभागात कार्यरत होते. दीपक मोरे सात ते आठ वर्ष नगररचना विभाग सोडून अन्य विभागात गेले नाही. यापूर्वी या अधिकाऱ्यांच्या इतर विभागात बदल्या झाल्या होत्या. त्या दबाव आणून त्यांनी रद्द करुन धन्यता मानली होती.

हेही वाचा >>> डोंबिवलीत मोठागाव मधील तरुणांना रेल्वे पुलावर १५ जणांची बेदम मारहाण

वाद्ग्रस्त निवृत्त उपअभियंता सुनील जोशी यांचे खास समर्थक म्हणून दीपक मोरे ओळखले जात होते. नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांचे खास म्हणून डावरे यांची ओळख होती. या दोन्ही वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे मोरे, डावरे यांना कधीही कोणी नगररचना विभागातून बदली करण्याचा प्रयत्न केला नाही. मागील पाच दिवसापूर्वी आयुक्त दांगडे यांनी डावरे, मोरे यांच्या बदलीचे आदेश काढताच हे दोन्ही अभियंते तात्काळ मंत्रालयाच्या दिशेने जाऊन काही राजकीय मंडळींच्या भेटी घेऊन बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. बदली रद्द होणार या अपेक्षेने डावरे, मोरे यांनी दोन दिवस बदली आदेश स्वीकारले नाहीत. आता बदली कोणीही रद्द करू शकत नाही याची जाणीव झाल्यावर डावरे यांनी पाणी पुरवठा विभागातील ब प्रभागातील पदभार स्वीकारला. दीपक मोरे यांनी मात्र आजारपणाच्या रजेवर जाऊन बदलीच्या ठिकाणी जाण्यास तयार नसल्याचे सूचित केले आहे. आमच्या शिवाय नगररचना विभागाचा कारभार चालू शकत नाही, अशी नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांची मानसिकता झाली आहे.

हेही वाचा >>> शिवशाहीला कार धडकून भीषण अपघात; ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपक मोरे यांचं निधन

नगररचना विभागात मागील २३ वर्षात ठरावीक अभियंते हातचलाखी करुन सक्रिय आहेत. या विभागात इतर अभियंता कोणी येणार नाही याची विशेष दक्षता प्रस्थापित अभियंते घेतात. नगररचना विभागातील गोंधळाच्या अनेक तक्रारी शासन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ईडीकडे दाखल आहेत. त्यांच्या चौकशा आता सुरू झाल्या आहेत. मुख्य सचिवांनी नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराची दखल घेऊन या विभागात शासन पदस्थापनेवरील नगररचनाकार पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरुध्द सामाजिक कार्यकर्ते किशोर सोहोनी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत टेंगळे यांच्या मालमत्तेची चौकशी करणे आणि त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिसंख्य पदावर कार्यरत असताना त्यांना नगररचना विभागात प्रशासनाने बदली कोणत्या निकषाने दिली याचीही चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. नगररचना विभागातील अनेक वर्षाचे ठाणमांडे अधिकारी, कर्मचारी बदलत नाहीत, तोपर्यंत शहराचे नियोजन सुस्थित होणार नाही अशी चर्चा शहरातील विविध स्तरातील नागरिक, नियोजनकर्ते बोलत आहेत. डावरे, मोरे यांची बदली ही सुरुवात असून लवकरच उर्वरित अभियंत्यांच्या प्रशासन बदल्या करणार असल्याचे समजते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc commissioner transfer three engineers of town planning department after seven to 10 years zws