डोंबिवली-ठाणे अंतर २५ मिनिटावर आणणारा डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडीवरील माणकोली उड्डाण पूल पुढील वर्षी एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सोमवारच्या मुंबईतील बैठकीत महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाण्यात शक्तिप्रदर्शन करत शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विकास प्रकल्पांची सद्यस्थिती, रखडलेले प्रकल्प विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी एमएमआरडीए कार्यालयात पालिका, एमएमआरडीए अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत माणकोली उड्डाण पूल विषयाच्या कामावर चर्चा करण्यात आली. माणकोली पुलाचे काम अंतीम टप्प्यात आहे. महत्वाचा टप्पा जोडण्याचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यावेळी प्राधिकरणाचे सहआयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, आ. डाॅ. बालाजी किणीकर, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, प्रशांत काळे, राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम उपस्थित होते.

हेही वाचा- भाजपाकडून ‘नमो रमो नवरात्रोत्सव’चे आयोजन; गायिका अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर थिरकले डोंबिवलीकर

२०१३ पासून पुुलाची प्रक्रिया

माणकोली उड्डाण पुलाची प्रक्रिया २०१३ पासून सुरू झाली. माजी खा. आनंद परांजपे यांनी प्रथम या पुलाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून सुमारे २०० कोटीचा निधी मंजूर करुन आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. २०१४ मध्ये या पुलाची निवीदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया वर्षभर सुरू होती. काही तांत्रिक अडथळे आल्याने, पुलाच्या आराखड्यातील सुधारणांसाठी ठेकेदारांना संधी देण्यात आली. प्रत्यक्षात या पुलाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आले. या पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत ३६ महिने होती. हे काम उपलब्ध तंत्रसाहाय्याच्या मदतीने येत्या १८ महिन्यात पूर्ण करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन महानगर आयुक्त यु. पी. एस. मदान यांना केले होते.

या पुलाच्या भिवंडी बाजूचे भूसंपादन करण्यात तीन ते चार वर्षाचा वेळ गेला. पूल उभारणीचे काम अतिशय संथगतीने सुरू राहिल्याने पूल उभारणी विहित वेळेत झाली नाही. सहा वर्ष उलटुनही पूल सुरू होत नसल्याने प्रवासी नाराजी सूर काढत आहेत.

हेही वाचा- दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन

पुलाचे फायदे

माणकोली उड्डाण पुलामुळे डोंबिवली परिसरात येणाऱ्या प्रवाशांना, मालवाहू वाहन चालकांना शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्ता भागात न जाता मुंबई-नाशिक महामार्गान माणकोली येथे डावे वळण घेऊन अडीच किमीची रस्ता धाव पूर्ण करुन पुलाने डोंबिवलीत येता येणार आहे. या पुलामुळे डोंबिवली ठाणे अंतर अर्धा तासावर येणार आहे. डोंबिवली परिसरातील प्रवाशांची शिळफाटा, दुर्गाडी, कोन येथील कोंडीतून मुक्तता होऊन या रस्त्यांवरील वाहन भार कमी होणार आहे. २७ गाव, एमआयडीसी, डोंबिवली, कल्याण पूर्व भागातील प्रवासी डोंबिवलीतून ठाकुर्ली उड्डाण पूलमार्गे श्रीधऱ् म्हात्रे चौकातून उमेशनगर रेतीबंदर रस्त्याने रेल्वे उड्डाण पुलावरुन थेट माणकोली पुलावर जाणार आहे.

पूल सुरू झाल्यानंतरचे अडथळे

माणकोली पूल सुरु झाल्यानंतर मुंबई, नाशिक भागातील वाहने माणकोली, वेल्हे येथून रस्ते मार्गाने माणकोली पुलाकडे येतील. ही वाहने रेतीबंदर येथे वर्तुळकार रस्त्याने मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखाण पाडा भागातून ठाकुर्ली पत्रीपूल दिशेने निघून जातील. काही वाहने डोंबिवली रेल्वे फाटकावरील पुलावरुन उमेशनगर येथे उतरुन श्रीधर म्हात्रे चौक, महात्मा फुले चौकातून किंवा दिनदयाळ रस्ता, कोपर पूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
एकाचवेळी शहराबाहेरुन जड, अवजड, मोटार डोंबिवलीत येणार असल्याने शहरांतर्गत वाहतुकीवर त्या वाहनांचा भार येणार आहे. शहरातील वाहतूक आणि बाहेरील वाहतूक एकाचवेळी डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर एकत्र आल्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी शहरात होणार आहे. माणकोली उड्डाण पुलाचा विचार करुन तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिनदयाळ रस्ता, केळकर रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव तयार केले होते. ते प्रस्ताव सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी हाणून पाडले.

हेही वाचा- भाजपाकडून ‘नमो रमो नवरात्रोत्सव’चे आयोजन; गायिका अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर थिरकले डोंबिवलीकर

एप्रिलमध्ये माणकोली पूल सुरू झाला तर अद्याप वर्तुळकार रस्ता, रेतीबंदर रेल्वे फाटकावरील पुलांची कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे या रखडलेल्या कामांचा फटका वाहनांना बसणार आहे. रेतीबंदर, कोपर, आयरे, भोपर, काटई, हेदुटणे या वर्तुळकार रस्त्याच्या टप्पा एक ते दोन कामासाठी स्थानिक रहिवासी पालिकेला वर्तुळकार रस्त्यासाठी सर्व्हेक्षण, भूसंपादन करुन देत नाही याविषयावर सर्व पक्षीय मौन असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mankoli bridge in dombivli opened in april navi mumbai dpj
First published on: 04-10-2022 at 15:32 IST