ठाणे : मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला असल्याचे चित्र आहे. पावसाच्या पाण्याने तसेच वाहतुकी दरम्यान पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले असून किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात १० ते २० रूपयांनी वाढ झाली आहे.तर, घाऊक बाजारात माल जास्त आणि त्याची विक्री होत नसल्याने, शिल्लक राहिलेल्या पालेभाज्या खराब झाल्याने फेकाव्या लागले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे ५५० ते ६०० भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. यामध्ये सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांतून पालेभाज्यांच्या ६० ते ७० गाड्या दाखल होत असतात. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारातील पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर पावसामुळे वाहतुकीदरम्यान भाजी खराब होत असल्याचे समोर आले. त्यात वाहतूक अडथळ्यांमुळे गाड्या वेळेत बाजारात पोहोचत नाही. परिणामी, संपूर्ण वितरण साखळी कोलमडलेली असून त्याचा परिणाम थेट बाजारात दिसतो आहे.
विक्रेत्यांना मालाची निवड करताना कुजलेल्या पालेभाज्या फेकाव्या लागत आहे. तसेच त्यातुन उरलेला माल विक्रीस ठेवावा लागत आहे. यामुळे विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. घाऊक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर स्थिर आहेत. परंतु ठाण्यातील किरकोळ बाजारपेठांमध्ये पालेभाज्यांच्या दरात १० ते २० रूपयांनी वाढ झाली आहे. पावसामुळे गाड्यावेळेत पोहचत नाहीत तसेच वाहतुकीदरम्यान भाज्या कुजल्या जात आहेत. पालेभाज्या खराब होत असल्यामुळे त्या फेकून द्यावे लागत आहेत. यामुळे किरकोळ बाजारपेठांत पालेभाज्यांची आवक घटत आहे. आवक घटल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
प्रतिक्रिया
सध्याच्या वातावरणामुळे आणलेल्या पालेभाज्या दोन दिवसही टिकत नाहीत. पावसाने भिजत असल्यामुळे भाज्या खराब होत आहेत. त्यामुळे भाजीपाला खराब व्हायला सुरुवात झाली की लगेचच स्वस्त दरात विक्री करावी लागत आहे.जितेंद्र सिंग, किरकोळ भाजी विक्रेते
घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक आहे. परंतु पावसामुळे बाजारपेठांकडे ग्राहकांनी तसेच किरकोळ व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने शिल्लक राहिलेल्या पालेभाज्या खराब झाल्या आहेत. भाज्या खराब झाल्याने माल फेकुन द्यावा लागला आहे. शंकर पिंगळे, संचालक, भाजी विभाग, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती
पालेभाज्यांचे दर किरकोळात (जुडी)
भाजी | पुर्वी | आता |
मेथी | १५रू | ४० रू |
शेपु | २० रू | ३० रू |
कोथिंबीर | १० ते २० रू | ३० ते ५० रू |
पालक | २० रू | ३०रू |