ठाणे – नवी मुंबईतील पाणी कोणी चोरून नेले ते बघा, तपास करा आणि चोरलेले पाणी परत द्या असा टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला होता. यावर, नाईकांनी आमच्यावर आरोप करत असतील असे मला वाटत नाही. परंतू, त्यांनी पुरावे दिले तर बर होईल. नाहीतर आम्ही नवी मुंबईबाबत बरेचसे आरोप करू शकतो असा पलटवार खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांवर केला आहे.
मागील महिन्यात झालेल्या युवासेना मेळाव्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईतील पाणी टंचाईच्या प्रश्नावर महापालिकेवर टीका करताना अप्रत्यक्षपणे वन मंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना, नवी मुंबईतील पाणी कुठे चोरून नेले ते बघा, तपासा करा आणि चोरलेल पाणी परत द्या. म्हणजे नवी मुंबई मध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. नवी मुंबईकरांना कोणी अक्कल शिकवण्याची गरज नाही. नवी मुंबई हे गेल्या २५ वर्षांत घरपट्टी किंवा पाणीपट्टीत वाढ करत नसलेले शहर आहे. येथील शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभाग हा तुमच्या शहरांच्या तुलनेत १०० पटीने पुढे आहे,’ अशा शब्दांत गणेश नाईक यांनी विरोधकांना उत्तर दिले होते.
यावर पुन्हा एकदा नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे. ‘नाईक साहेबांनी आमच्यावर आरोप केले आहेत, नक्की कोणावर आरोप केले आहेत, मला नाही वाटत त्यांनी आमचे नाव घेतले आहे. परंतु ते जर आमच्यावर पाणी चोरीचा आरोप करत असतील तर, त्यांनी त्याचे पुरावे द्यावे. नाहीतर, नवी मुंबईच्या बाबतीत आम्ही बरेच आरोप करू शकतो अशा शब्दात म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
नेमके झाले काय ?
युवासेनेच्या मेळाव्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. ते म्हणाले होते की, नवी मुंबईत काही स्मशानभूमींना छत नाही, रस्ते नाहीत, सीआरझेडचे कारण दिले जाते, मग तुम्ही कसली सत्ता उपभोगलीत ? या आमच्या ठाण्यात आणि आमचे रस्ते बघा, स्मशानभूमी बघा, पाणी प्रश्न बघा आणि उद्याने बघा. यावर गणेश नाईकांनी नवी मुंबईतील पाणी कोणी चोरून नेले ते बघा, तपास करा आणि चोरलेले पाणी परत द्या अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. याला पुरावा द्या नाहीतर आम्ही देखील बरेच आरोप करू शकतो अशा शब्दांत नरेश म्हस्केंनी पलटवार दिल्याचे दिसून आले.