ठाणे : येथील वर्तकनगर भागातील रेंमड कंपनीच्या परिसरात जुने उद्यान आहे. या परिसरात आम्ही ज्यावेळी घरे घेतली, त्यावेळी त्या उद्यानाचा उल्लेख रेरामध्ये करण्यात आलेला होता. निसर्गसंपन्न परिसर असल्यामुळे आम्ही कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी केली पण, त्याच निसर्गचा ऱ्हास होणार असेल तर, आमच्या घरांचा काहीच अर्थ उरणार नाही, अशा प्रतिक्रिया आता स्थानिक रहिवाशांमधून उमटू लागल्या आहेत. या संदर्भात सर्व नागरिक एकत्र येऊन याबाबत लवकरच पुढील भुमिका घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवीन आलिशान प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. ५७२ कोटी रुपये खर्चुन दोन वर्षात या इमारतीचे बांधकाम पुर्ण केले जाणार आहे. ही इमारत ज्या जागेवर उभारली जात आहे, तिथे यापुर्वी भव्य असे उद्यान आहे. या उद्यानाच्या जागेचे आरक्षण बदलून तिथे महापालिका इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेेने यापुर्वीच घेतला असून त्यापाठोपाठ आता याच परिसरातील ६३१ वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे.या निर्णयामुळे भव्य उद्यान आणि वनराईच्या मोहात याठिकाणी कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांना मात्र या सगळ्या प्रकारामुळे धक्का बसला असून वृक्षतोडीविरोधात आता नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ठाणे महापालिकेची इमारत उभारण्यास आमचा विरोध नाही. पण, निसर्गाचा ऱ्हास करून इमारत उभारणे चुकीचे आहे. पालिकाही जनतेच्या हितासाठी असते. पालिका ही विश्वस्त म्हणून काम करते. परंतु जनतेचे हित डावलून पालिकेचा कारभार सुरू असेल तर, तो चुकीचा आहे. इथे शेतच कुंपन खात आहे, असे स्थानिक रहिवाशी सुभाष जगताप यांनी सांगितले. बगीचा आरक्षणाला विरोध केला, त्यावेळीही विरोध डावलून निर्णय घेण्यात आला. आता वृक्षांची तोड केली जाणार आहे. यामुळे येथील निसर्गाचा ऱ्हास होऊन पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार आहे. आम्ही निसर्गसंपन्न परिसर म्हणून कोट्यावधी रुपयांची घरे घेतली. आता या निसर्गावरच कुऱ्हाड चालवली जाणार असेल तर आमच्या घरांना काहीच अर्थ उरत नाही, असेही ते म्हणाले.

ज्याठिकाणी जास्त वृक्ष असतात, त्याठिकाणी प्राणवायुचे प्रमाण अधिक असते, हाच विचार करून आम्ही येथे घर खरेदी केले. परंतु आता इथले वृक्ष तोडून निसर्गाचा ऱ्हास केला जाणार असेल तर, आम्ही ज्या विचारातून घरे घेतली, त्याला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे इतक्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याऐवजी पालिकेने दुसऱ्या जागेचा पर्याय निवडणे, योग्य होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी राहुल सादरे यांनी दिली. येथील वर्तकनगर भागातील रेंमड कंपनीच्या परिसरात जुने उद्यान आहे. या परिसरात आम्ही ज्यावेळी घरे घेतली, त्यावेळी त्या उद्यानाचा उल्लेख रेरामध्ये करण्यात आलेला होता. निसर्गसंपन्न परिसर असल्यामुळे आम्ही कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी केली पण, त्याच निसर्गचा ऱ्हास होणार असेल तर, आमच्या घरांचा काहीच अर्थ उरणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी प्रिया डोंगरे यांनी दिली. बगीचा आरक्षणला विरोध केला त्याचेही आम्हा उत्तर मिळाले नाही. आरक्षण बदलाच्या निकालाची प्रतही देण्यात आली नाही. आमच्यासाठी जलकुंभ उभारण्यात येत होता. त्याचेही काम पालिकेने थांबविले. त्यामुळे पालिका जनतेच्या हितासाठी आहे की हिताविरोधात असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असेही त्या म्हणाल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New luxurious administrative building of thane municipal corporation will be constructed on site of raymond company residents oppesed sud 02