ठाणे : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दोन गटात वाद झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह सर्वच क्षेत्रातील पोलिसांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडून सलोख राखण्याचे आवाहन पोलीस करत करत आहेत. समाजमाध्यमांवर अफवा पसरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांवरही पोलिसांचे लक्ष लागून आहे.
नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादानंतर नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाली. पोलिसांवर देखील हल्ले झाले. या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहराचा ग्रामीण आणि शहरी भाग येतो. ठाणे शहर पोलिसांनी भिवंडी, मुंब्रा शहरात विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांच्या नागरिकांसोबत बैठक सुरू असून नागरिकांना सलोखा राखण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. तसेच संवेदनशील भागात पोलिसांकडून गस्ती घातली जात आहे. समाजमाध्यमांवर अफवांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ठाणे आयुक्लाय क्षेत्रात सलोखा राखण्यासाठी नागरिकांच्या बैठका घेतल्या जात आहे. कोणीही अफवा पसरविणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तसेच आयुक्तालय क्षेत्रात पथकांची गस्ती सुरू आहे असे ठाणे शहर पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोकण परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील पोलिसांना समाजमामाध्यमांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. – संजयय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र.
© The Indian Express (P) Ltd