लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा आणि पातलीपाडा या तीन पुलांच्या नुतनीकरणाचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत पहिल्या टप्प्यात कापूरबावडी पूलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे दीड ते दोन महिने ही कामे सुरू राहतील. आधीच मेट्रोची कामांमुळे कोंडी होत असताना आता पुलांच्या नुतनीकरण कामामुळे कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.

घोडबंदर मार्गावरील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ हे उड्डाणपूल महत्त्वाचे मानले जातात. हजारो जड-अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई येथून घोडबंदर मार्गे वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच घोडबंदर भागात नागरीवस्ती अधिक आहे. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्याकाही वर्षांपासून घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामांमुळे येथील रस्ते अरूंद झाल्याने येथे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत कोंडी होते. त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो. या कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या १५ ते २० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी एक तासांचा अवधी लागत आहे.

आणखी वाचा-डोंबिवली: मनसे शहराध्यक्षपदी राहुल कामत यांची निवड

घोडबंदर मार्गालगतचे सेवा रस्ते आणि उड्डाणपूलांची परिस्थिती खराब आहे. एप्रिलमध्ये येथील वाघबीळ, पातलीपाडा, मानपाडा पूलाचे नुतनीकरण आणि कापूरबावडी पूलाचा काही भाग दुरुस्त केला जाणार होता. त्यासाठी ५ कोटी ८९ लाख रुपयांची मंजूरी मिळाली होती. परंतु पावसाळ्यापूर्वी साकेत उड्डाणपूलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यात या पुलांच्या नुतनीकरणाची कामे हाती घेतली तर मोठी कोंडी होण्याची शक्यता होती. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील केवळ वाघबीळ पूलाची दुरुस्ती केली होती. तर उर्वरित पूलांचे काम पावसाळ्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता. या पुलांवर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. या कामामुळे हे रस्ते उंच सखल झाल्याने अपघाताची भिती व्यक्त होत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आता कापूरबावडी, मानपाडा आणि पातलीपाडा उड्डाणपूलाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून हे काम येत्या एक ते दोन दिवसांत सुरू होणार आहे. शिवाय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माजिवडा चौकाजवळ मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारण्याची तयारी सुरू केली आहे. याठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील देवीचापाडा येथील बेकायदा इमारत भुईसपाट ; पोलीस बंदोबस्त नसताना आक्रमक कारवाई

कापूरबावडी उड्डाणपूलावरील घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याची काही ठिकाणी दुरावस्था झाली आहे. हा रस्ता उंच-सखल झाल्याने अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कापूरबावडी उड्डाणपूलाचे काम केले जाणार असून या कामासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. तर मानपाडा आणि पातलीपाडा उड्डाणपूलांची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation of three bridges on ghodbunder marg mrj