कल्याण- यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सगुणा तंत्रज्ञानाच्या भात लागवडीला (एस. आर. टी.) शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले. जून-जुलैमध्ये शेतांमध्ये लागवड केलेली भात रोपे आता बहरली आहेत. या लागवडीमध्ये कष्ट, मजुरीचा प्रकार कमी होत असल्याने शेतकरी या लागवडीला प्राधान्य देत आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जून, जुलैमध्ये मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण तालुक्यांमधील गावांमध्ये फिरुन सगुणा तंत्रज्ञानातील भात लागवडीला प्राधान्य देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. शेतकऱ्यांना घराच्या दारात लागवडीसाठी बियाणे कृषी साहाय्यकांनी उपलब्ध करुन दिले होते. कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांनी सगुणा तंत्रज्ञानाच्या लागवडीला सर्वाधिक प्राधान्य दिले.जुलैमध्ये रोपण केलेली भात रोपे आता बहरली आहेत. भात रोपांच्या मुळाशी, आजुबाजुला असलेले गवत नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी गोल औषधाची फवारणी केली. अनेक शेतकऱ्यांनी खत मारुन भाते जोमदार येतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे. शेताच्या बांधांमध्ये अधिवास असलेल्या खेकड्यांनी मात्र काही लागवड फस्त केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक उपाय योजना करुन खेकडे लागवड रात्रीच्या वेळेत खाणे थांबवत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी अधिकाऱ्यांनी मात्र खेकड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामुळे ठाण्यात कोंडी

हेही वाचा >>>“शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी आली पण…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान

एसआरटी तंत्र

जूनमध्ये शेतकऱ्यांनी भात शेतात नांगर किंवा ट्रॅक्टरने उखळणी करुन घ्यायची. मृगाचा पहिला पाऊस सुरू झाला की तात्काळ शेतामध्ये दोन ते तीन फूट अंतराने ओटे तयार करायचे. या ओट्यांमध्ये पेरणी यंत्रातून किंवा मजुरी माणसांकडून भाताचे दाणे ठराविक अंतराने पेरत जायचे. एकदा रोपणी केली की ती तुऱ्यावर (भात लोंगवा) येईपर्यंत शेतकऱ्याला शेतामध्ये रोपे उखळणी, लावणी असे प्रकार करावे लागत नाहीत. एकदा रोपणी केली की त्या शेतात पुन्हा गवत येणार नाही. रोपावर रोग पडणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना घ्यायची आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लावणीचे कष्ट आणि खर्च कमी झाला आहे. या लागवडीतून भरघोस भातपीक असल्याच्या अनुभव अनेक शेतकऱ्यांना आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saguna technology srt rice cultivation in rural areas of thane district was given the highest priority by farmers amy