ठाणे : उन्हाळ्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेडसावणाऱ्या पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. यामध्ये प्रामुख्याने शहापूर, मुरबाड आणि काही अंशी अंबरनाथ तसेच कल्याण तालुक्यातील गावांचा आणि पाड्यांचा समावेश असतो. फेब्रुवारी महिना सुरु झाला असून सद्यस्थितीत मुरबाड आणि शहापूर तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध तालुक्यांसाठी पाणीटंचाईसाठी उपायोजना राबविण्याबाबत आराखडा आखण्यात आला आहे. याअंतर्गत २१ गावांमध्ये विंधन विहीरी तयार करणे आणि सुमारे १०० गावांमध्ये नियमित स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील ठाणे, अंबरनाथ आणि भिवंडी या तालुक्यातील गावांना शहरी भाग लागून असल्याने पाणी समस्येची तीव्रता काही अंशी कमी आहे. मात्र शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते. या दोन्ही तालुक्यांमध्ये शेकडोच्या संख्येने तुरळक तसेच काही हजार लोकसंख्या असलेल्या गावांचा समावेश आहे. तर यातील या दोन्ही तालुक्यातील एकूण २४ गावांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. तर उर्वरित गावांना प्रशासनाकडून नळजोडणी, कुपनलिका, विहिरी, तलाव यांसारख्या योजनांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र या योजना देखील वेळेत पूर्ण होत नसल्याने प्रामुख्याने शहापूर तालुक्यातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागत असल्याचे चित्र कायम दिसून येत असते.

हेही वाचा…डोंबिवली एमआयडीसीत कमी दाबाने पाणी पुरवठा, रहिवासी हैराण

जिल्ह्यात काळू, शाई यांसारखी धरण प्रस्तावीत आहेत. मात्र त्याचे देखील नियोजन अद्याप कागदावरच असल्याने पाणी प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याचे अनेकदा अधोरेखित होत असते. याच पार्शवभूमीवर जिल्हा परिषद आणी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध टंचाई ग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून जून महिन्यापर्यंत त्यांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विविध उपायोजना राबविण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा…टिएमटीचा पर्यावरणपुरक बस खरेदीवर भर, डबल डेकर बसगाड्या खरेदी प्रस्तावित, तिकीट दरात वाढ नाही

कुठे विंधन विहीरी ?

अंबरनाथ तालुक्यातील ८ गावे २६ पाडे
भिवंडी तालुक्यातील ४ गावे १९ पाडे

कल्याण तालुक्यातील ४ पाडे
शहापूर तालुक्यातील ९ गावे ३१ पाडे

( यासाठी ६८.६ लाख रुपयांची तरतूद )

हेही वाचा…ठाण्यातील सेंट्रल पार्कचे नामकरण नमो सेंट्रल पार्क – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

कुठे टँकर ने पाणीपुरवठा ?

मुरबाड तालुक्यातील २८ गावे ६२ पाडे

शहापूर तालुक्यातील ७२ गावे २०६ पाडे

( यासाठी ४ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद ) २४९८

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district administration draw up remedial plan for water scarcity in murbad and shahapur tehsils psg