ठाणे : शहरात काही दिवसांपूर्वी एलजीबीटीक्यू समुहाच्या रॅलीला भाजपा युवा मोर्चा कडून निदर्शने करत विरोध करण्यात आला. या विरोधानंतर ही रॅली थांबविण्यात आली असा दावा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु, ही रॅली ठराविक ठिकाणीच संपन्न झाली तसेच या रॅलीत कोणीही विभत्स कपडे परिधान केले नव्हते असे मत एलजीबीटीक्यू समुहाच्या नक्षत्र बागवे यांनी पत्रकार परिषदेत मांडले. या रॅलीच्या माध्यमातून केवळ राजकीय पोळी भाजून घेतली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

एलजीबीटीक्यू समुदायाच्या वतीने ठाणे शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या रॅलीला भाजपा युवा मोर्चाने विरोध करुन रॅली थांबविण्यात आली असा दावा पक्षाने केल्यानंतर एलजीबीटीक्यू समुदायाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला द रेनबो पेरेंट्स च्या संस्थापिका नीलाक्षी रॉय आणि तृतीयपंथी क्रिस्टीना एवर्स उपस्थित होते.

एलजीबीटीक्यू समुहाचे अस्तित्व आणि हक्क याबाबत समाजात जागृकता निर्माण व्हावी यासाठी या समुदायाच्यावतीने याआधी देखील चार ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. ठाणे शहर हे पाचव ठिकाण होत की, जिथे एलजीबीटीक्यू समुहाची रॅली निघाली. या रॅलीसाठी आम्ही गेले दोन ते तीन महिन्यांपासून तयारी केली. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस अशा या सर्वांची आम्ही कायदेशिर परवानगी घेऊनच रॅली काढली होती. आम्ही वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी आमची रॅली संपन्न केली. या रॅलीत कोणीही विभत्स पद्धतीचे कपडे परिधान केले नव्हते तसेच गैरवर्तन देखील केले नाही. आम्ही जर गैरवर्तन केले असेल तर, त्याचा पुरावा भाजप युवा मोर्चाने सादर करावा, असे नक्षत्र बागवे यांनी सांगितले. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. आम्ही लहानपणापासूनच अनेक आव्हानांना सामोरे जात असतो. परंतु, या रॅली संदर्भात भाजपा युवा मोर्चाने पसरविण्यात आलेला गैरसमज म्हणजे केवळ राजकीय फायद्यासाठी होता असा दावा या समुदायाच्या वतीने करण्यात आला आहे.

भाजपा युवा मोर्चा प्रतिक्रिया..

एलजीबीटीक्यू समुदायाला असे वाटतं की, त्यांनी त्यांची रॅली ठराविक ठिकाणी संपन्न केली. असे असेल तर, या रॅली संदर्भात त्यांनी वारंवार बोलण्याची गरज नाही. मुळात, आम्ही निदर्शने करून कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा घेतलेला नाही. तुम्हाला तुमचे हक्क मांडायचे होते, तर त्यासाठी इतर दिवस देखील निवडता आले असते. पण, तुम्ही ही रॅली अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी काढली. ज्या दिवशी शहरात विविध कार्यक्रम सुरू होते. मासुंदा तलावाजवळ देखील एक कार्यक्रम सुरू होता. या रॅलीमध्ये अनेकांनी विभत्स कपडे परिधान केले होते. त्यात काही जणांनी गैरवर्तन देखील केलं, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.- समर्थ नायक, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा