ठाणे : ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतानाच, उष्णतेची ही स्थिती काही काळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्वाच्या सुचना नागरिकांना केल्या आहेत. तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने ठाणेकरांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. हा उष्माघात टाळण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. उष्माघाताची लक्षणे कोणती, त्यामुळे काय त्रास होतो, याची माहिती पालिकेने दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावे. प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी. ओआरएस किंवा लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत इत्यादी घ्यावे, त्यात मिठाचे योग्य प्रमाण वापरावे. ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे व भाज्या यांचा आहारात उपयोग करावा. कॉटनयुक्त सैलसर व सौम्य रंगांचे कपडे वापरावे. उन्हात घराबाहेर असताना टोपी अथवा छत्रीचा वापर करावा. शक्यतो घरात रहावे. घरातील हवा थंड व खेळती रहावी. थेट सूर्यप्रकाशापासून घराचे संरक्षण करावे. घराबाहेर जाणे आवश्यक असल्यास सकाळी आणि सायंकाळच्या वेळेचा उपयोग करावा. लहान मुले, गरोदर स्त्रिया, घराबाहेर काम करणारे नागरिक, मानसिक दृष्टया आजारी असलेली व्यक्ती, शारीरिक दृष्टया आजारी असलेले नागरिक आदींनी काळजी घ्यावी. वयस्कर, आजारी व्यक्ती यांनी घरात एकटे राहू नये. घरात थंडावा राखावा, अशा सुचना पालिकेने केल्या आहेत. तसेच उष्माघातामुळे होणारी ताप, ग्लानी, संभ्रमावस्था अशी लक्षणे आढळली तर, ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २५३४ ७७८५/८६/८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तेथे त्वरित उपचार केले जातील, असे पालिकेने म्हटले आहे.

हे करु नये

दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. शारीरिक श्रमाची कामे करू नयेत. चपला किंवा बुटाशिवाय घराबाहेर जाऊ नये. स्वयंपाक करीत असताना हवा पुरेशी खेळती राहील, याची काळजी घ्यावी. चहा, कॉफी, मद्य यांचे सेवन करू नये. साखरेचे अधिक प्रमाण असलेली पेये घेऊ नयेत. हाय प्रोटीन आहार व शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले व पाळीव जनावरे यांना पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये ठेऊ नये.

उष्माघाताचे परिणाम

शरीराचे तापमान वाढणे. अति उष्म्यामुळे अंगावर रॅश येणे, हातापायांना सुज येणे, मसल्स क्रॅम्प येणे, बेशुध्द पडणे, असा त्रास होतो. उष्माघाताने आधीच असलेल्या आजाराची तीव्रता वाढते.

उष्माघात लक्षणे

चक्कर येणे, बेशुध्द होणे, मळमळ, उलटी, डोकेदुखी होणे. खूप तहान लागणे. लघवी अत्यंत पिवळी होणे. श्वासोच्छवास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे. ही लक्षणे आढळल्यास त्वरित काळजी घ्यावी, योग्य उपचार घ्यावेत. अशा व्यक्तीला ताबडतोब हवेशीर जागेत न्यावे. पाणी पिण्यास द्यावे. जर स्नायुंना दुखापत झाली तर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना त्वरीत बोलवावे, असा सुचना पालिकेने केल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation appeal to the citizens about summer heat and health issue asj