ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाण्यातील घोडबंदर भागात सुरू असलेल्या वाहतुक कोंडीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांनी प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरूवात केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. सोमवारी ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कोलशेत- ढोकाळी भागातील रस्त्यांची पाहाणी केली. तर दुसरीकडे अपघाताचे केंद्र ठरलेल्या पातलीपाडा येथील उड्डाणपुलालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने अडथळे बसवून तात्पुरती उपाययोजना करण्यास सुरूवात झाली आहे. लवकरच येथील उड्डाणपुलाच्या चढणी जवळील भागात कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. परंतु या उपाययोजना कायमस्वरूपी अमलात आणाव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातील कोंडीचे केंद्र ठरलेल्या घोडबंदर मार्गावर मागील काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीमध्ये शाळेच्या बसगाड्या, नोकरदारांची वाहने अडकत आहेत. मागील आठवड्यात सलग दोन दिवस वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या अपघाताने अनेक शाळांनी दुपारच्या सत्रामध्ये सुट्टी जाहीर केली. तर, सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी परतणारे विद्यार्थी अडीच ते तीन तास कोंडीत अडकून होते. नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.

हे ही वाचा…ठाणेकरांना ७२ तासआधी हवा गुणवत्ता कळणार? हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित

या कोंडीनंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिका, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना करण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी उपायुक्त पंकज शिरसाट, ठाणे महापालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे आणि माजी नगरसेवक संजय भोईर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कोलशेत – ढोकाळी मार्गाची पाहाणी केली.

या मार्गावर मागील काही वर्षांत वाहतुकीचा भार वाढला आहे. कोलशेत येथे तयार करण्यात आलेले महापालिकेचे सेंट्रल पार्क यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी काही ठिकाणी दुभाजक, गतीरोधक आहेत. त्यांचे स्थान बदलण्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच येथील वाहतुकीचे आणखी काही दिवस सर्व्हेक्षण केले जाणार आहे. तसेच पातलीपाडा येथील उड्डाणपुलाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात अडथळे बसविले आहेत. उड्डाणपुलाच्या चढणीजवळ काही दुरूस्ती करून लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. तसेच कॅडबरी उड्डाणपुलाजवळही अपघात रोखण्यासठी नव्याने अडथळे बसविण्यात आले आहेत. उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असली तरी त्या कायमस्वरूपी अमलात आणल्या जाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

हे ही वाचा… अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहे. कोलशेत-ढोकाळी रस्त्याचे सर्व्हेक्षण महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. सर्व्हेक्षणानंतर काही बदल सुचविले जातील. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic conginction in ghodbandar administration finally started temporary repairs on flyovers start inspection of roads sud 02