वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण
ठाणे – बाळकुम परिसरातील मुख्य चौकात शुक्रवारपासून ते सोमवारपर्यंत मालवाहतूक आणि पर्यटकांची वर्दळ अधिक असते. शुक्रवार ते रविवार अनेक कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. तर शनिवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये भिवंडीतील गोदामांमधून मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे या परिसरात कायमच सकाळ आणि सायंकाळच्यावेळी वाहतूक कोंडी होते. हा परिसर मुख्य रहदारीचा तसेच शालेय परिसर असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. या वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून सिग्नल यंत्रणा बंद करून वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते.
बाळकुम हे ठाणे शहरातील वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हा परिसर भिवंडी, माजिवडा, कापूरबावडी आणि ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांना जोडतो. शिवाय, शहरातील विविध रस्ते येथे एकत्र येतात. याशिवाय, वर्षभरापूर्वी या परिसरात इस्कॉन मंदिर आणि नमो द ग्रॅड सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आली आहे.
यामुळे या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे अशा विविध जिल्ह्यातून तसेच शहरातील नागरिक पर्यटनासाठी येत असतात. तसेच कशेळी, काल्हेर, भिवंडी या भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. यामुळे विविध शहरातील महिला आणि पुरूष कामानिमित्ताने बाळकुम मार्गे प्रवास करत असतात. परिणामी, अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ इथे वाढली आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे.
यामुळे आधीच अरूंद रस्ते झाले आहे. यामुळे गर्दीच्या वेळेत या मार्गावर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यरत ठेवली जाते. परंतु शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये अनेक कार्यालयांना सुट्टी असते. यामुळे पर्यटनासाठी सर्वाधिक नागरिक हे या तीन दिवसांमध्ये बाळकुम परिसरात येत असतात. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी आणि आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारी भिवंडीतील गोदामांमधून मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते.
यामुळे बाळकुम परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. कामावर जाणारे नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी या कोंडीत अडकतात, तर काही वेळा ही कोंडी साकेतपर्यंत पोहोचते. त्यात या परिसरात शाळा तसेच महाविद्यालय असल्याने लहान मुले देखील या कोंडीतून प्रवास करतात. त्यामुळे या कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बाळकुम परिसरात शुक्रवार, शनिवार आणि सोमवार या दिवशी मालवाहतूक आणि पर्यटकांची वर्दळ अधिक असते. बाळकुम सिग्नलवरून सुटलेली वाहने लगेच पुढे दादलानी पार्क सिग्नलला अडकतात, त्यामुळे कोंडी वाढते. यासाठी या दिवशी सिग्नल बंद ठेवून वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते. – पंकज शिरसाट, वाहतूक पोलीस उपायुक्त
बाळकुम नाक्यावर शाळा आणि महाविद्यालय आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे परिसरातील मुख्य रस्ता ओलांडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. – सारीका सुर्यवंशी, नागरिक