कल्याण – जळगाव मधील धरणगाव तालुक्यातील मोठा भोईवाडा गावातील एक फळ विक्रेत्या शेतकरी आणि त्यांच्या इतर सहकारी शेतकऱ्यांची कल्याणमधील दोन फळ विक्रेत्यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत १० लाख ५५ हजार ९३१ रूपयांची फसवणूक केली आहे. नियमित तगादा लावूनही कल्याणमधील दोन्ही विक्रेत्यांनी फळ खरेदीची रक्कम शेतकऱ्यांना परत न केल्याने अखेर शनिवारी जळगाव मधील फळ विक्रेत्या शेतकऱ्याने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी जळगाव मधील धरणगाव तालुक्यातील मोठा भोईवाडा धरणगावातील बापू राजाराम भोई (३६) या टरबुज फळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने आस्लम शेख (५०, रा. काळा तलाव, मकबरा इमारत, कल्याण पश्चिम), आदम शेख (३०, रा. वालधुनी, कल्याण ) यांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही.

अधिक माहितीसाठी फसवणूक करणाऱ्या फळ विक्रेते आस्लम शेख, आदम शेख यांच्या भ्रमणध्वनीवर सतत संपर्क साधला. त्यांचे संपर्क क्रमांक बंद येत होते. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील महालक्ष्मी हाॅटेल मागील लक्ष्मी भाजीपाला बाजारात हा फसवणुकीचा प्रकार मार्च २०२४ ते मे २०२५ या वर्षभराच्या कालावधीत घडला आहे. तक्रारदार शेतकरी बापू भोई यांनी पोलीस ठाण्यात आणि लोकसत्ताला दिलेली माहिती, अशी की जळगाव मधील एकूण १५ शेतकऱ्यांनी कल्याणमधील फळ विक्रेते आस्लम शेख, आदम शेख या फळ विक्रेत्यांबरोबर टरबूज खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी एकूण २५ लाखाचा व्यवहार केला होता. जळगाव मधील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली टरबूज आस्लम, आदम यांनी कल्याणमधील लक्ष्मी भाजीपाला बाजारात खरेदी करण्याचा हा व्यवहार होता. आस्लम, आदम यांनी ठरल्या शब्दाप्रमाणे जळगावमधील शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षभरात वेळोवेळी टरबूज खरेदी केली.

ठरल्या रकमेतील सुमारे साडे चौदा लाख रूपये त्यांनी शेतकऱ्यांना परत केले. एक टरबुजाची गाडी सुमारे ६० ते ६२ हजार रूपयांपर्यंत जाते. रमजानच्या सणाच्या काळात आस्लम, आदम यांंनी पाठोपाठ टरबुजाच्या चार गाड्या मागवून घेतल्या. त्यांच्यावर विश्वास असल्याने आम्ही त्यांची मागणी पाहून टरबुजाच्या गाड्या कल्याणला पाठविल्या. रमजान सणानंतर आस्मल, आदम शेख यांनी शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. ते विविध कारणे देऊन पैसे आज, उद्या देऊ असे सांगू लागले. पैसे देण्यासाठी ते शेतकऱ्यांना तारखा देत होते. त्याची अंमलबजावणी मात्र ते करत नव्हते. त्यांनी त्यांचे मोबाईल फोन बंद करून ठेवले. त्यामुळे आस्लम, आदमकडून पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने आपण त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

जळगावचे इतर फसवणूक झालेले शेतकरी या फसवणूक प्रकरणी आपणास जाब विचारत आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट, मेहनत करून टरबुजे पिकवली आहेत. त्याचे पैसे न मिळाल्याने फसवणूक झालेले शेतकरी अस्वस्थ आहेत, असे तक्रारदार बापू भोई यांनी सांगितले. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.