Kokan Mango Viral Video : कोकणातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी देशभरातली पर्यटक गर्दी करीत असतात. कोकणातील समुद्रकिनारे, गड-किल्ले, पुरातन मंदिरे आणि विशेषत: आंबा, काजूच्या बागा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी रीघ लागलेली असते. त्यात पर्यटकांना कोकणाची शान असलेल्या हापूस आंब्यांविषयी फार आकर्षण असते. पण हे हापूस आंबे पिकवणे खाण्याइतके सोपे काम नाही,.अशाच कष्टाने पिकवलेल्या आमराईतील पडलेले आंबे उचलल्याने एका पर्यटक कुटुंबाला वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक कोकणी बाई नागपूरहून आलेल्या पर्यटक कुटुंबीयांवर आंब्यांची चोरी केल्याला आरोप करीत त्यांना खडेबोल सुनावताना ऐकू येत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ कोकणी बाईने स्वत: काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
कोकणात आलेल्या पर्यटकांना पडलेले आंबे उचलणे पडले महागात
व्हायरल व्हिडीओ कोकणातील कोणत्या गावातील आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नागपूरहून काही पर्यटक चारचाकी गाडीने कोकणात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी या पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या आमराईत आंब्याच्या झाडाखाली पडलेले दोन-तीन आंबे गोळा केले. तेवढ्यात आमराईची मालकीण बाई तिथे आली आणि तिने व्हिडीओ काढत पर्यटकांना आंबे का चोरले, असा सवाल करीत खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली. तिने लहान मूलही न बघता अक्षरश: पर्यटकांची लाज काढली. त्यानंतर पर्यटकांनी गोळा केलेले आंबे त्यांच्याकडून परत मागून घेतले. इतकंच नाही, तर आंबे चोरून गाडीत तर ठेवले नाही ना, असा संशय घेत पूर्ण गाडी चेक करू द्या, अशी मागणी केली. चिमुकली आंबा मागत असतानाही तिने तो दिला नाही. या घटनेवरून आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“लाज वाटत नाही का? कोकणात शेतकरी राबतो आणि….”
व्हिडीओत तुम्ही ऐकू शकता की, ती कोकणी बाई पर्यटकांना पाहून जाब विचारते की, कुठून आलात? झाडावरचे आंबे काढले? ज्यावर पर्यटक उत्तर देतो की, दिसले म्हणून थांबलो. त्यावर कोकणी बाई पुन्हा तेच तेच विचारते की, आमच्या बागेतले आंबे का घेतले, किती आंबे घेतले, मला गाडी बघायची आहे, चेक करू द्या. त्यावर पर्यटक उत्तर देतात की, तुटून खाली पडलेलेच उचलले, तोडले नाही. इथवरचं हे संभाषण थांबत नाही.
“तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेलं काही घेतलं तर चालेल का?”
ती कोकणी बाई त्यांना काही ना काही बोलतच सुटते. मेहनतीने शेतकरी आंबा पिकवतो, खाली पडलेले असले म्हणून काय झालं? ते आमचे आंबे आहेत. सगळे आंबे बाहेर काढा. काय म्हणून आंबे घ्यायला आलात तुम्ही, अजून काढले असतील तर परत द्या, कष्ट किती लागतात माहितेय का? तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेलं काही घेतलं तर चालेल का? झाडांना पाणी कोण घालतं? कष्ट कोण करतं? हे सर्व ऐकून घेत पर्यटक त्या कोकणी बाईला ताई आमचं ऐकून घ्या, अशी विनंती करतात.
“ही शुद्ध चोरी आहे. आंबे घेताना मला सांगितलं होतं का”
पण, पुन्हा त्यावर कोकणी बाई सुनावते की, ताई म्हणजे काय? ही शुद्ध चोरी आहे. आंबे घेताना मला सांगितलं होतं का, पडलेल्या आंब्यांचं आम्ही कॅनिंग करतो. पडलेले आंबेही महत्त्वाचे आहेत. जेवढे आंबे आहेत, तेवढे दाखवा आणि सगळे बाहेर काढा. सुशिक्षित माणसं दिसताय तुम्ही, लाज वाटत नाही का, अशी चोरी करायला जेवढी चोरी केली, त्याचे पैसे द्या. एवढी बाग उभी करायला अनेक वर्ष कष्टाचं पाणी केलंयं, हा व्हिडीओ मी यूट्यूबवर टाकणार आहे आणि दाखवणार पर्यटक येऊन कशी आंब्यांची चोरी करतात ते? त्यावर पर्यटक आम्ही चोरी केली नाही, असं म्हणत उचललेल्या आंब्यांचे पैसे देण्यासही तयार होतात. पण,ती कोकणी बाई कोणाचंही काही ऐकून घेण्यास तयार नसते. ती पर्यटकांना भडाभडा काहीच्या काही बोलतच सुटते.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्या पर्यटकांनी केलेलं कृत्य चुकीचेच असल्याचे म्हटले आहे. पण चार आंब्यांसाठी कोकणी बाईने ज्या प्रकारे पर्यटकांना सुनावले ते फारच चुकीचे असल्याचे म्हटले आहे.