भाईंदर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याचा भाजपाचा मानस आहे. त्यामुळे गांधी विरोधात देशभरात वातावरण निर्माण करण्याचे काम महायुतीमार्फत केले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मिरा भाईंदरमध्ये पक्षाच्या कोकण विभागीय मेळाव्यात ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील पंचाहत्तर वर्ष काँग्रेसने देशात संविधानाचे वातावरण निर्माण करून ठेवले होते. म्हणूनच एक चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकला. मात्र भाजपा सत्तेत आल्यापासून संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यात राहुल गांधी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत असल्यामुळे त्यांना धमकवण्याची भाषा सर्वत्र सुरू आहे. मात्र गांधी हे संविधानाच्या मार्गानेच आणि सत्य बोलत आहेत. त्यामुळे गांधींना धमकवणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. आणि याबाबतचा खुलासा खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा – वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण

निवडणुका घोषित झाल्यावर मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी फिरून दाखवावे

आज राज्यात शेतकऱ्यांची अंत्यत वाईट अवस्था आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे तो आंदोलन आणि निवेदने देऊन सरकारपुढे आपली समस्या मांडत आहे. नुकतीच काही शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने स्वाक्षरी केलेली निवेदने मुख्यमंत्री ताफ्यात घुसून दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याऐवजी गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच त्यांना आतंकवादीसारखी उपमा देऊन सरकार बदनाम करत आहे. त्यामुळे सरकारच्या या भूमिकेबाबत आता अन्नदाता शांत बसणार नाही. सरकारला देखील हे चांगलेच ठाऊक झाले असून कडेकोट बंदोबस्त घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फिरत आहेत. परंतु निवडणुका घोषित झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी असे फिरून दाखवावे, असे आव्हान एकप्रकारे पटोळे यांनी दिले.

हेही वाचा – ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या

‘पोलीस महासंचालक भाजपाचे काम करतात’

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या भाजपाचेच काम करतात असा आरोप पटोले यांनी केला आहे. आज राज्यात महिला पोलिसांचा देखील वारंवार अपमान होत आहे. त्यामुळे महिला म्हणून तरी महासंचालकांनी पोलिसांना बदनाम करणाऱ्यांना जेलमध्ये टाकावे असेही प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp intention to kill rahul gandhi says nana patole in mira bhayander ssb