सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्ष स्वागतानिमित्ताने पाटर्य़ामध्ये मद्य रिचवून वाहन चालवीत घरी परतणाऱ्या ग्राहकांना पर्यायी वाहनचालक तसेच रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरविण्याच्या सूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील बार मालकांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, हॉटेल किंवा बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना या सुविधा उपलब्ध असतील, याची माहिती देण्यासाठी फलक लावावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या शिवाय, रात्री उशिरापर्यंत पाटर्य़ासाठी बारमध्ये येणाऱ्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी बारमालकांनी ग्राहकांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करावी तसेच हॉटेलबाहेर किमान चार खासगी वॉर्डन नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे ठाणे शहरातील बारमालकांचे धाबे दणाणले आहेत.
सरत्या वर्षांला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते. या पाटर्य़ाच्या निमित्ताने रिसॉर्ट, धाबे, फार्म हाऊस, बार आदी ठिकाणे हाऊसफुल्ल असतात. या पाटर्य़ासाठी अनेक हॉटेल तसेच बार व्यावसायिक डिजेच्या तालावर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यामुळे मांसाहार पदार्थावर ताव मारत आणि मद्याचे पेग रिचवत पहाटेपर्यंत या पाटर्य़ा चालतात. या पाटर्य़ानंतर घरी परतण्यासाठी अनेकजण मद्याच्या नशेत स्वत: वाहन चालवत घरी परतत असतात. मात्र मद्य सेवनामुळे चालकांना वाहन चालविण्याची शुद्ध नसते. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता असते. या अपघातामुळे रस्त्यावरील दुसऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. यापूर्वीच्या अपघातातून हे उघड झाले आहे. याच पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी बारमालकांना नोटिसा बजावल्या असून त्यामध्ये नववर्ष पाटर्य़ाच्या निमित्ताने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हॉटेल किंवा बारमध्ये येणाऱ्या ज्या ग्राहकांकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील मद्य पिण्याचा परवाना नाही, अशा व्यक्तींना मद्य पुरविण्यात येऊ नये. हॉटेल किंवा बारमध्ये आलेल्या ग्राहकांनी मद्याचे सेवन केले आणि तो वाहन चालवत घरी परतणार असेल तर त्यास वाहन चालविण्यास प्रतिबंध करावा. अशा चालकांना घरी परतण्यासाठी वाहनचालक द्यावेत किंवा रिक्षा, टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हॉटेल किंवा बारच्या ठिकाणी पुरेशी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसेल तर पर्यायी पार्किंगची व्यवस्था करावी किंवा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी बारबाहेर किमान चार वॉर्डन नेमावेत, अशा महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना थर्टी फर्स्टच्या रात्रीपासून नववर्ष पहाटेपर्यंत करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी बारमालकांना दिले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कडेकोट बंदोबस्त..
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये थर्टीफर्स्टच्या निमित्ताने ठाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सुमारे साडेचार हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांमार्फत सुमारे २२ महत्त्वाच्या ठिकाणांवर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून त्यामध्ये मद्यपी चालक, भरधाव वाहन चालविणे, ट्रिपलसीट वाहतूक आदींवर कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी एका दिवासात सुमारे ५० मद्यपी चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.
पोलिसांचे आवाहन..
मद्यपी वाहनचालकांकडून अपघात होऊ नयेत, यासाठी हॉटेल किंवा बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पर्यायी वाहन चालक पुरवावेत किंवा रिक्षा, टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बारमालकांना दिल्या आहेत. तसेच अशा सुविधा उपलब्ध असतील, याविषयी माहिती देणारे फलक लावावेत, अशाही सूचना दिल्या आहेत. मद्याच्या सेवनामुळे मद्यपी चालकांना वाहन चालविण्याची शुद्ध नसते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होऊ शकतो. या अपघातांमुळे स्वत:चा आणि इतरांचे प्राण धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केले आहे.