दुष्काळाची मोठी झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ात विविध पक्षांच्या बडय़ा नेत्यांचे दौरे होत आहेत. पण त्यातून दिलासा कमी व राजकारणच अधिक होत असल्याची सर्वसाधारण भावना जनतेत व्यक्त होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेसाठी जालना शहराची निवड केली. ‘मराठवाडय़ातील दुष्काळी जनतेचा आक्रोश’ या नावाखाली असल्यामुळे ही सभा होत असल्याचे फलक झळकले. राज्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते व आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असल्याने शहरात भगवे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर महिनाभराने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मत मागायला नव्हे मांडायला येत आहे’ असे म्हणत जालना शहरात सभा घेतली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागत ‘राज्य हातात द्या, बदल करून दाखवतो’ असे आवाहन केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही दुष्काळी भागाचा दौरा केला. परंतु तत्पूर्वी जिल्ह्य़ात प्रशासकीय पातळीवर काय नियोजन केले आहे, याची माहिती घेण्याची तसदी त्यांनी घेतली नसावी. अन्यथा जिल्हा प्रशासनाचा जुलैपर्यंत आराखडा तयार असूनही मे-जूनपर्यंत तयार करण्याची मागणी करताना मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घालतो, असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दुष्काळी भागाची पाहणी, ग्रामस्थांशी चर्चा व जिल्हा प्रशासनाकडून नियोजनाची माहिती घेतली. परंतु त्यांच्या पाठीमागे किती गाडय़ा असाव्यात याचा काही धरबंध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवला नाही. शंभरापेक्षा अधिक गाडय़ा पवार यांच्यामागे धावत होत्या. याच धावपळीत एका कॅबिनेट मंत्र्यांच्या काडीवर दुसरी गाडी आदळल्याचा प्रकार घडला.
भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी जिल्ह्य़ातील काही दुष्काळी गावांचाच दौरा केल्यानंतर पत्रकार परिषदेत ज्या काही मागण्या केल्या, त्यासंदर्भात आदेश आधीच निघाला होता. तावडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, त्यावेळी सारवासारव करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्य़ाचा दौरा केला. तो साहजिकच त्यांच्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गराडय़ात.
केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या दौऱ्यासाठी जमा केलेली माहिती घेऊन अधिकारी बैठकीस हजर होतेच. मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती तयार ठेवण्याचेच काम आता जुलैपर्यंत अधिकाऱ्यांना असणार आहे.
मंत्री राजेंद्र दर्डा यांनी जिल्ह्यातील काही दुष्काळी गावांची पाहणी करून जनावरांच्या छावणीस भेट दिली. तेथे भोजन तयार होते. मंत्री म्हटल्यावर त्यांच्यासोबत पाच-पन्नास पत्रावळी उठणार आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची संस्कृती जपायची म्हटल्यावर हे जेवण काही दुष्काळातील शेतक ऱ्यासारखे चटणी-भाकरीचे असून कसे असेल? याच छावणीचे उद्घाटन पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले.
त्यावेळी चांगला शामियाना तर होताच, परंतु डाळ-बाठीच्या पंगतीही उठल्या. अर्थात, जेवणावळीस टोपे व देशपांडे मात्र नव्हते. शरद पवार यांनी या छावणीस भेट दिली, तेव्हा मात्र नारळपाणी होते!
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळात दिलासा कमी, राजकारणच जास्त!
दुष्काळाची मोठी झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ात विविध पक्षांच्या बडय़ा नेत्यांचे दौरे होत आहेत. पण त्यातून दिलासा कमी व राजकारणच अधिक होत असल्याची सर्वसाधारण भावना जनतेत व्यक्त होत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-03-2013 at 02:34 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minimum relief in drought maximum politics