परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स, त्रिधारा व योगेश्वरी या तीन कारखान्यांचे गेल्या दोन महिन्यांत आजपर्यंत ४ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. चालू हंगामात पाथरीचा रेणुका शुगर्स हा कारखाना चालू होऊ शकला नाहीतर सायखेडा येथील महाराष्ट्र शुगर्सच्या गाळपाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल १ हजार ८०० रुपयेप्रमाणे दिली आहे.  
परभणी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. दिवाळीनंतर त्रिधारा शुगर्स, गंगाखेड शुगर्स व योगेश्वरी हे तीन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले. काही तांत्रिक अडचणीमुळे पाथरीचा रेणुका शुगर हा कारखाना चालू होऊ शकला नाही. त्यामुळे पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस जवळच्या योगेश्वरीला घातला तर काही शेतकऱ्यांनी माजलगाव तालुक्यातील बजाज व जालना तालुक्यांत टोपे यांच्या कारखान्याला ऊस दिला. सायखेडाच्या महाराष्ट्र शुगर्स कारखान्याकडे गाळपासंबंधी माहिती विचारण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नसल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे.
त्रिधारा शुगर्सचे ५७ दिवसांत १ लाख २ हजार मेट्रिक टन, िलबाच्या योगेश्वरीचे ६० दिवसांत १ लाख ६ हजार मेट्रिक टन, तर गंगाखेड शुगर्सचे ५६ दिवसांत २ लाख ८० हजार मेट्रिक टन गाळप झाले आहे. जिल्ह्यात अजून बराच ऊस शेतात उभा आहे, त्यामुळे या कारखान्याचे गाळप १५ फेब्रुवारीपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane filter in sugar factory parbhani