मुंबई : बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स ४८२ अंशांनी वधारला तर निफ्टी २१,७०० पातळीच्या वर बंद झाला. देशात किरकोळ महागाईदर कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बाजाराकडे मोर्चा वळविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८२.७० अंशांनी वधारून ७१,५५५.१९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ७१,६६२.७४ ही सत्रातील उच्चांकी तर ७०,९२४.३० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२७.२० अंशांची भर पडली आणि तो २१,७४३.२५ पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा >>> ‘गोल्ड ईटीएफ’ची चमक वाढली; जानेवारीमध्ये ६५७ कोटींची नक्त गुंतवणूक

बँकिंग क्षेत्रातील तेजीमुळे सोमवारच्या घसरणीतून सावरत बाजाराने मंगळवारच्या सत्रात वाढ नोंदवली. देशांतर्गत चलनवाढीच्या घसरणीमुळे बाजारात सकारात्मक भावना निर्माण झाली. एकूण महागाई कमी झाल्याने ग्रामीण मागणीला चालना मिळेल. आता अमेरिकेतील महागाई दराकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. कारण त्यावरून अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची व्याजदराबाबत पुढील भूमिका ठरेल, असे मत जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये, आयसीआयसीआय बँकेचा समभाग २.४६ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक, विप्रो, कोटक महिंद्र बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग तेजीत होते. तर अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्र अँड महिंद्र, टायटन, टाटा मोटर्स आणि नेस्लेच्या समभागांमध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) गुंतवणूकदारांनी १२६.६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा २० लाख कोटींचा टप्पा

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही २० लाख कोटी बाजारभांडवलाचा टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. वर्ष २०२४ मध्ये समभागामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या समभागाने २,९५८ रुपयांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

हेही वाचा >>> ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी आणखी ६० दिवसांची मुदतवाढ

ऑगस्ट २००५ मध्ये या समूहाने १ लाख कोटी बाजारभांडवलाचा टप्पा ओलांडला होता, एप्रिल २००७ मध्ये २ लाख कोटी रुपये, सप्टेंबर २००७ मध्ये ३ लाख कोटी रुपये आणि ऑक्टोबर २००७ मध्ये ४ लाख कोटी रुपये गाठले. आणि तेव्हापासून, २० लाख कोटी बाजारभांडवलाचा टप्पा गाठण्यासाठी १२ वर्षे लागली. जुलै २०१७ मध्ये ५ लाख कोटी, तर बाजार मूल्य नोव्हेंबर २०१९ मध्ये १० लाख कोटी आणि सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटींवर पोहोचले. तेथून २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ६०० दिवसांत गाठला गेला.

सेन्सेक्स ७१,५५५.१९ ४८२.७० (०.६८%)

निफ्टी २१,७४३.२५ १२७.२० (०.५९%)

डॉलर ८३ — तेल ८२.६४ ०.७८

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market update sensex up 482 points nifty settles above 21 0 print eco news zws