नवी दिल्ली : संघ-भाजपविरोधात ताकदीने आणि प्रभावीपणे संघर्ष कोण करू शकेल, या मुद्दय़ावरून काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवली जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दोन्ही उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यामध्ये संघ-भाजपविरोधात लढण्यावरून सहमती झाली असली तरी, त्यासाठी सक्षम कोण, हा वादाचा मुद्दा ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधी कुटुंबाचे ‘अधिकृत’ मानले जात असलेले उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना सहमतीने पक्षाध्यक्ष ठरवण्याचे व संघ-भाजपविरोधात एकत्रित लढण्याचे आवाहन केले होते. पण, थरूर यांनी खरगेंची विनंती फेटाळली.  थरूर यांनी प्रत्युत्तर दिले की, काँग्रेसमधील आपण सगळेच संघ-भाजपविरोधात लढत आहोत पण, हे काम कसे केले पाहिजे आणि ते प्रभावीपणे कोण करू शकेल, या पक्षाध्यक्ष निवडणुकीतील कळीचा मुद्दा आहे. १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून मतदारांनी याच कळीच्या मुद्दय़ावर मतदान केले पाहिजे, असे थरूर यांचे म्हणणे आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणारा प्रत्येक जण कट्टर हिंदूत्ववादी होता असे नव्हे. त्यामुळे त्यांना सक्षम पर्याय मिळाला तर मतदार काँग्रेसलाही पुन्हा मतदान करू शकतात, असे थरूर यांनी म्हटले आहे. संघ-भाजपविरोधात प्रभावीपणे लढण्याची काँग्रेसची क्षमता असेल तर पुन्हा मतदार काँग्रेसकडे वळू शकतील असे थरूर यांनी सूचित केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लोकांनाही सक्षम उमेदवार निवडून आला पाहिजे असे वाटते.

 खरगे हे काँग्रेसमधील सत्ताधाऱ्यांचेच प्रतिनिधी आहेत. खरगे पक्षाध्यक्ष झाले तर काँग्रेसमध्ये पूर्वीचीच सत्तेची परिस्थिती कायम राहील, असे थरूर यांचे म्हणणे आहे. अशा सर्व मुद्दय़ांवरून थरूर यांनी खरगेंना खुल्या चर्चेचे आवाहन दिले आहे. पण, खरगे यांनी ते नाकारले आहे. पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नव्हे, अशी भूमिका खरगे यांच्या गटाने घेतली आहे.

संघ-भाजपविरोधात लढण्यासाठी बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी आपल्याला पािठबा दिला असल्याचा दावा खरगेंनी केला होता, त्यावर थरूर यांनीही सहमती व्यक्त केली असून ‘जी-२३’ हा प्रसारमाध्यमांतून तयार झालेला गट असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

पद सोडा मग, प्रचार करा!

दोन्ही उमेदवारांपैकी कोणाचाही प्रचार करण्याची मुभा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना असली तरी, पदाचा राजीनामा देऊन प्रचारात सहभागी व्हा, असे आदेश सोमवारी पक्षाच्या वतीने काढण्यात आला आहे. राष्ट्रीय महासचिव, प्रदेश प्रभारी, सचिव, सहसचिव, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते, विविध विभागांचे प्रमुख, प्रवक्ते यांनी पदाचा राजीनामा देऊन पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करावा, असे परिपत्रक काढण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge and shashi tharoor agree to fight against sangh bjp zws