कृषी कायद्यावरून वादग्रस्त विधान करून अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःहून मागणी करून रद्द केलेले तिन्ही कृषी कायदे परत आणावेत असं आवाहन कंगना रणौत यांनी केलं आहे. यावरून हरयाणातील भाजपा नेत्यांनी कंगना यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. तसंच, त्यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नसते, असंही स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना रणौत यांचं विधान काय?

“शेतकरी हे विकसित देशाचे स्तंभ आहेत. काही राज्यांनी विरोध केल्याने रद्द झालेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली पाहिजे”, असं कंगना रणौत म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. कारण, केंद्र सरकारनेच पूर्ण विचाराने हे कायदे मागे घेतले होते. अन् आता पक्षाच्या खासदाराकडूनच कायदा पुन्हा आणण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केलं जातंय.

हेही वाचा >> Kangana Ranaut : कंगना रणौत यांचं वक्तव्य, “बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचं शोषण केलं जातं, हिरो डिनरला बोलवतात आणि…”

कंगना जे बोलतात ती पक्षाची भूमिका नाही

हरयाणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी म्हटलं की, कंगना रणौत काहीही बरळत असतात. पण त्या जे काही बोलतात ती पक्षाची भूमिका नसते. तर हरयाणाचे भाजपा नेते गौरव भाटिया म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीन कृषी कायद्यांवरून भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांचं एक वक्तव्य चाललं आहे. हे त्यांचं विधान वैयक्तिक असून भारतीय जनता पक्षाकडून असं कोणतंही वक्तव्य करण्याकरता कंगना रणौत या अधिकृत नाही. त्यामुळे त्यांचं हे विधान आम्हाला मान्य नाही.

गौरव भाटिया यांचा व्हिडिओ रिशेअर करून कंगना रणौत म्हणाल्या, “कृषी कायद्याबाबत मी जे काही वक्तव्य केलं आहे ती माझी वैयक्तिक भूमिका आहे. पक्षाशी याचा काहीही संबंध नाही.”

कंगना रणौत यांनी मागितली माफी

“माझ्या वक्तव्याने अनेकजण नाराज झाले आहेत. कृषी कायदे अंमलात आले होते, तेव्हा अनेकांनी समर्थन केलं होतं. पण संवेदनशीलता आणि सहानुभूतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेतले होते. हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे की पंतप्रधानांच्या शब्दांचा मान राखणं. मला ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की मी आता एक कलाकार नसून भाजपाची कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी मतं वैयक्तिक असता कामा नये, तर पक्षाची भूमिका असली पाहिजे. मी जर माझ्या शब्दांनी आणि विचारांनी कोणाला नाराज केलं असेल तर मला याचा खेद राहील. मी माझे शब्द मागे घेते”, असं कंगना रणौत म्हणाल्या.

काँग्रेसनेही दिलं शेतकऱ्यांना आश्वासन

“शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की केंद्र सरकार पुन्हा एकदा ते तिन्ही कृषी कायदे परत आणण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांबरोबर उभे आहे. त्यामुळे हे कायदे पुन्हा येणार नाहीत”, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp kangana ranuat remark on farm laws haryana bjp leaders opposed sgk