मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भूमिका मांडत नसल्यामुळे विरोधकांनी त्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला. आज या प्रस्तावावर लोकसभेत दोन्ही बाजूंनी आक्रमक चर्चा होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत या प्रस्तावावर भाषण केल्यानंतर त्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या बाकांवरून आक्रमकपणे भूमिका मांडण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दांत सवाल केले. तसेच, देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे नागरिकांच्या भावना इथे मांडण्यासाठी आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

“या सरकारला नवरत्न वगैरे बोलण्याची हौस आहे”

“यांना फार हौस आहे नवरत्न वगैरे बोलण्याचा. गेल्या ९ वर्षांत या सरकारने काय मिळवलं. भाजपानं पाडलेली राज्य सरकारं, महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर, सरकारी संस्थांच पतन, भारताचं जागतिक स्तरावर घसरलेलं मानांकन आणि कायदा-व्यवस्थेचा मुद्दा”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“भाजपानं ९ वर्षांत ९ सरकारं पाडली”

“गेल्या ९ वर्षांत भाजपानं ९ सरकारं पाडली आहेत. अरुणाचल, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी आणि महाराष्ट्र सरकार दोन वेळा. महात्मा गांधींची सात पापं वगैरे अमित शाह म्हणाले. ते सिद्धांतांवर बोलले तेव्हा मला चांगलं वाटलं. त्यात ते म्हणाले पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल. जेव्हा भाजपा सत्तेत नव्हती, तेव्हा ते म्हणत होते पार्टी विथ डिफरन्स. पण तुम्ही वेगळे कसे ठरता?”, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

“१८.२ लाख कोटींचे एनपीए जर सरकार माफ करत असेल, तर शेतकऱ्यांचं कर्जही माफ करून टाका. हे १८.२ लाख कोटी कुणाचे माफ केले कुणास ठाऊक. यात शून्य तरी किती येतात हेही मला माहीत नाही. एवढं गणित मला तरी येत नाही”, असा टोला सुप्रिया सुळेंनी यावेळी नरेंद्र मोदी सरकारला लगावला.

“आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का?”

दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीकास्र सोडलं. “मणिपूरमध्ये लाजिरवाण्या चुका तिथल्या राज्य सरकारकडून झाल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. १७९ मृत्यू, ६० हजार लोक बेघर झाले, ३५० रिलीफ कॅम्प, कॅम्पमध्ये निर्वासित ४० हजार, ३६६२ घरं जाळली. ३२१ प्रार्थनास्थळं जाळली. १६१ केंद्रीय दलं तैनात करण्यात आली. १० हजारहून जास्त दंगली, हत्या, बलात्काराची प्रकरणं घडली आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का?” असा परखड सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

खासदार म्हणून पहिल्याच भाषणात माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंचं घटनेच्या मूलभूत चौकटीवरच प्रश्नचिन्ह…

“तुम्ही अशा सरकारला पाठिंबा कसा देऊ शकता. हे सत्ताधारी आणि विरोधकांबद्दल नाहीये. हे या देशाच्या महिलांच्या सन्मानाबद्दल आहे. तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढाल?” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp supriya sule no confidence motion against pm narendra modi on manipur violence pmw