मागील अडीच महिन्यांहून अधिक काळापासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. तर हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. मणिपूर हिंसाचारावरून संसदेत विरोधीपक्षांनी सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरमध्ये महिलांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. हा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नेमकं काय प्रयत्न केले? याचं स्पष्टीकरण संसदेत देण्याची गरज आहे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हणाल्या, “लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. देशभरात आरक्षण हा संघर्षाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका असो की मणिपूर येथील वांशिक हिंसाचार, यामागे आरक्षणाचाच मुद्दा आहे. मणिपूर येथील हिंसाचारात जून महिन्यात १४२ जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे. जुलै संपत आला तरी येथील हिंसाचार थांबायचं नाव घेत नाही. जवळपास ५४ हजार लोक विस्थापित झाले असून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे.”

हेही वाचा- पश्चिम बंगालमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

“देशाचा जगभरात गौरव वाढवणारी महिला बॉक्सर मेरी कॉमच्या राज्यात महिलांप्रती झालेला हिंसाचार अतिशय गंभीर बाब आहे. महिलांना दिवसाढवळ्या गोळ्या मारल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर मणिपूर येथील हिंसाचाराबाबत सरकारला तातडीने कारवाई करावी लागली. सरकारने हा व्हिडीओ जास्त पसरु नये, यासाठी प्रयत्न केले. तपास यंत्रणांना याप्रकरणी गुन्हे दाखल करुन आरोपींना गजाआड करण्यासाठी ७७ दिवस लागले. हा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले? याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

हेही वाचा- “आधी भावाची हत्या केली मग बहिणीला नग्न करत धिंड काढली”, मणिपूरमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं?

“ज्या भागात वांशिक हिंसाचार उसळला आहे त्या भागातील महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तसेच तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. मणिपूरला निर्भय महिलांचा वारसा आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यांच्याबरोबर उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. ‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’ हे विसरता कामा नये,” असंही सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp supriya sule on manipur violence pm narendra modi parliament mansoon session rmm