काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन ते चर्चांमध्ये सहभागी होत आहेत. केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधींना अतिथी व्याख्याते म्हणूनही पाचारण करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मांडत असलेल्या भूमिका चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याचे पडसाद देशांतर्गत राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर लंडनमधील एका चर्चासत्राचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात एका अनिवासी भारतीय महिलेने राहुल गांधींना विचारलेल्या प्रश्नाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधींनी आपल्या दौऱ्यामध्ये एका कार्यक्रमात भारतात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशा आशयाचं विधान केल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. त्यावरून काँग्रेसवर टीका केली जात आहे. तसेच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींचं विधान फेटाळून लावावं, अशी मागणीही भाजपाकडून केली जात आहे. अशाच प्रकारे आता लंडनमधील या चर्चासत्राचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

लंडनमधील चेथम हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रामध्ये राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी मालिनी मेहरा नावाच्या एका अनिवासी भारतीय महिलेने राहुल गांधींसमोर तिची भूमिका मांडली. तसेच, अनिवासी भारतीय म्हणून देशात लोकशाही पुन्हा रुजवण्यासाठी आम्ही काय करू शकतो? असा प्रश्नही मालिनी मेहरा यांनी उपस्थित केला आहे.

“माझं नाव मालिनी मेहरा आहे. आज देशाबाहेर दोन कोटींपेक्षा जास्त अनिवासी भारतीय आहेत. मला आपल्या देशाची सध्याची परिस्थिती पाहून प्रचंड दु:ख होतंय. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते. त्यांना या गोष्टीचा गर्व होता. पण आज ते आपल्या देशाला ओळखू शकत नाहीयेत”, असं मालिनी मेहरा यांनी राहुल गांधींसमोर मुद्दा मांडताना सांगितलं.

“आम्ही लोक भारताबाहेर राहतो. एक भारतीय या नात्याने माझा तुम्हाला प्रश्न आहे. आम्ही भारतासाठी काय योगदान देऊ शकतो? आम्ही पुन्हा एकदा आपल्या लोकशाहीला कसे मजबूत बनवू शकतो?” असा प्रश्न मालिनी मेहरा यांनी राहुल गांधींना विचारला.

“प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटायला पाहिजे, कारण…” बॉलिवूड अभिनेत्यानं केलं राहुल गांधींचं कौतुक

“मी हे म्हणालो असतो, तर पक्षपाती ठरलो असतो”

दरम्यान, राहुल गांधींनी यावर उत्तर देताना मी असं म्हणालो असतो, तर पक्षपाती ठरलो असतो असं म्हटलं आहे. “तुम्ही सांगितलं की तुमचे वडील आरएसएसमध्ये होते आणि आता ते आपल्या देशाला ओळखत नाहीयेत. या चर्चेत हे सांगणं हीच फार मोठी बाब आहे. मी असं म्हणालो तर लोक कदाचित म्हणतील की मी पक्षपाती भूमिका घेतोय. पण जेव्हा तुम्ही हे म्हणता, तेव्हा त्याचा वेगळा प्रभाव पडतो. मला वाटतं की लोकांना तुम्ही एक भारतीय म्हणून तुमची मूल्य सांगणं आणि भारतानं पुन्हा मूळ मूल्यांकडे परत जायला हवं हे सांगणं याचाच अर्थ तुम्ही देशासाठी तुमचं कर्तव्य पार पाडत आहात”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi in london rss mans daughter speaks about indian values pmw