रॉकफेलर इंटरनॅशनलचे अध्यक्ष रुचिर शर्मा यांची नुकतीच ‘एक्स्प्रेस अड्डा’मध्ये सविस्तर मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध मुद्द्यांवर मुद्देसूद भाष्य केलं. यावेळी रुचिर शर्मा यांनी देशातील मोदी सरकारच्या कामगिरीवर भाष्य करताना सरकारला एक सल्लाही दिला आहे. उद्योग क्षेत्रात रुचिर शर्मा हे नाव मोठं असलं, तरी ते एक राजकीय विश्लेषकही आहेत. त्यामुळे रुचिर शर्मांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सल्ला का महत्त्वाचा?

रुचिर शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तपास यंत्रणांचा राजकीय विरोधकांविरोधात शस्त्र म्हणून वापर करण्यासंदर्भात सल्ला दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या विरोधी पक्षांनी केंद्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर व विविध राज्यांमध्येही तपास यंत्रणांचा भाजपा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे आरोप केले आहेत. तपास यंत्रणांच्या कारवायांमार्फत राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर रूचिर शर्मांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे.

काय म्हणाले रुचिर शर्मा?

२०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी नसून मोदी विरुद्ध मोदी अशीच असल्याचा दावा रुचिर शर्मा यांनी केला. प्रबळ विरोधी पक्ष वा चेहऱ्याच्या अभावामुळे मोदींचा सामना त्यांच्या स्वत:शीच असेल, असं ते म्हणाले. मात्र, असं म्हणताना त्यांनी मोदींना केंद्रीय तपास यंत्रणांचा शस्र म्हणून वापर करण्यासंदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

“मला वाटतं सध्या देशांतर्गत व्यवसाय क्षेत्रात एक प्रकारची भीती आहे यात शंका नाही. आर्थिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्यादेखील. त्यामुळे मोदी सरकारला जर कोणत्या एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे तर ती म्हणजे तपास यंत्रणांचा शस्र म्हणून होत असलेल्या वापराची”, असं रूचिर शर्मा यांनी मुलाखतीमध्ये बोलताना नमूद केलं.

पंतप्रधानांना कोणता सल्ला द्याल?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणता सल्ला द्याल? असा प्रश्न विचारला असता रुचिर शर्मा यांनी तपास यंत्रणांच्या विषयाला हात घातला. “सध्या अशी पद्धत दिसतेय की कधीकधी सगळेच भ्रमिष्टाप्रमाणे वागू लागतात आणि सगळंच चांगलं आहे असं म्हणू लागतात. मला आशा आहे की अशी काही यंत्रणा असेल जिथून मोदींना सत्य परिस्थितीची माहिती मिळत असेल”, असंही रुचिर यावेळी म्हणाले.

“मोदी खोटं बोलत होते, आख्ख्या लडाखला माहितीये की…”, राहुल गांधींचं टीकास्र; चीनचा केल…

“जर तुम्हाला राजकीय विरोधकांच्या विरोधात तपास यंत्रणांचा शस्र म्हणून वापर करायचा असेल तर हरकत नाही. पण मग या यंत्रणा त्यांच्या अधिकारांचा गैरवापर नेमका कसा करत आहेत? अनेक लोकांवर त्या धडक कारवाया करत आहेत पण त्याचवेळी उद्योग क्षेत्रातील विश्वासाच्या वातावरणावर मात्र यामुळे परिणाम होत आहे. हे कुणी सांगतंय का? ही माहिती कुणी मोदींपर्यंत पोहोचवतंय का? आज मला याची सर्वात जास्त काळजी आहे”, अशा शब्दांत रुचिर शर्मा यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruchir sharma warns pm narendra modi of weaponization of central agencies pmw