राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. अशातच या बैठकीत काय चर्चा झाली यावर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत दोन विषयांवर चर्चा केल्याचं सांगितलं. यात पहिला विषय महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीच्या मंजुरीचा विषय आणि दुसरा संजय राऊत यांचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत दोन विषयांवर चर्चा केली. एक मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत.”

“मोदींसोबत महाराष्ट्रातील कारवायांबाबत चर्चा केली नाही, पण…”

“महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांबाबत मी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली नाही. मी यातील केवळ एका प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण एका पत्रकाराशी संबंधित आहे. त्या पत्रकाराचं नाव आहे संजय राऊत. संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र ते महाराष्ट्रातील सामना वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार म्हणाले, “परवा त्यांचे फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केल्या आहेत. हा अन्याय आहे. आम्ही ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली.”

हेही वाचा : “राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून माझे नाव…”, आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टींचं मोठं विधान

“आम्ही आमचे दोन विषय पंतप्रधान मोदींच्या कानावर घातले आहेत. त्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली नाही. मला आशा आहे की या विषयांवर ते गंभीरपणे विचार करतील आणि निर्णय घेतील,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar first reaction after meeting with pm narendra modi in delhi pbs