मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला. संख्याबळाच्या जोरावर हा ठराव पारित होणार नाही हे विरोधकांना माहिती असूनही मोदींना मणिपूर हिंसाचारावर बोलतं करण्यासाठी विरोधकांनी हा ठराव मांडला. या ठरावावर भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दोन तासांहून जास्त वेळ भाषण केलं. या भाषणावर विरोधकांकडून तीव्र शब्दांत टीका केली जात आहे. मोदींनी भाषणात फक्त काही मिनिटेच मणिपूरवर भाष्य केलं असून इतर सगळा वेळ काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ही राजकीय दिवाळखोरीच”

मोदींनी काँग्रेसवर टीका करणं, ही राजकीय दिवाळखोरी असल्याची टीका ठाकरे गटानं सामनातील अग्रलेखातून केली आहे. “मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असताना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत. यात नेहरूंचा दोष काय?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

“मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत. पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत”, अशा शब्दांत ठाकरे गटानं मोदींना लक्ष्य केलं आहे.

“सूर्य तुमच्या मालकीचा आहे का?”

दरम्यान, मोदींच्या एका वाक्यावरून ठाकरे गटानं मोदींना टोला लगावला आहे. “आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय? अविश्वास ठरावाच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले व सत्ता पक्षाची चिडचिड अनुभवता आली. संसदेतून बाहेर फेकलेले राहुल गांधींचे भाषण हे त्या चिडचिडीमागचे मुख्य कारण. दहा वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आज राहिलेले नाहीत. सत्यवचनी व बेडर गांधींसमोर मोदी-शहांच्या नेतृत्वाची कसोटी लागत आहे”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

“..हे मोदी-शाहांचे मानसिक दौर्बल्य”

“२०१४ व २०१९ असा दोन वेळा काँग्रेसचा पराभव करूनही या दोघांना २०२४ साली काँग्रेसची भीती वाटते व ते काँग्रेसवरच हल्ला चढवत आहेत. हे त्यांचे मानसिक दौर्बल्य आहे. मणिपूर प्रश्नावर राजकारण न करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. मोदी यांनी २ तास १३ मिनिटांचे भाषण केले. त्यात २ तास १० मिनिटे राजकारण व उरलेली ३ मिनिटे मणिपूर होते. अविश्वास ठरावाच्या दरम्यान मोदी-शहा हे पूर्ण काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray faction targets pm narendra modi speech in loksabha pmw