लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी झाला. पंतप्रधानांसह ३० कॅबिनेट, पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यातील सहा जणांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून यात तीन नवे चेहरे आहेत. या शपथविधीने वाजपेयी सरकारनंतर पुन्हा एकदा रालोआचा कालखंड सुरू झाला आहे.
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप २४० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून रालोआने २९३ जागा जिंकल्यानंतर मोदी यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी तिसऱ्या मोदी सरकारचा शपथविधी झाला. यावेळी राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, एस. जयशंकर या जुन्या चेहऱ्यांसह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ देण्यात आलेल्या ३० कॅबिनेट मंत्र्यांपैकी १९ जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर ११ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या मंत्र्यांचा बोलबाला आहे. घटक पक्षांपैकी जेडीएसचे एच डी कुमारस्वामी, जेडीयूचे राजीव रंजन, टीडीपीचे के राम मोहन नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास पासवान गट) चिराग पासवान आणि हिंदुस्तान अवामी मोर्चाचे जितनराम मांझी यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
कुमारस्वामी, शिवराजसिंह चौहान, खट्टर, सर्बानंद सोनोवाल, मांझी आणि राजनाथ सिंह या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारमध्ये नवी भूमिका स्वीकाली आहे. तर मागच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर आणि राजीव चंद्रशेखर या महत्त्वाच्या मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात २७ ओबीसी, १० दलित, ५ आदिवासी, ५ अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश आहे. अश्विनी वैष्णव, हरदीपसिंह पुरी, जयशंकर, कुरियन, सीतारामन हे राज्यसभेतील खासदार मंत्री असून पंजाबमधील रवनीतसिंह बिट्टू आणि तमिळनाडूतील एम. मुरुगन यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही केंद्र सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या साथीने १४० कोटी भारतीयांची सेवा करून देशाला नव्या उंचीवर न्यायचे आहे. हे मंत्रिमंडळ म्हणजे अनुभवी आणि तरुणांचे उत्तम मिश्रण आहे. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी काम करण्यात आम्ही कोणतीही कसूर करणार नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
© The Indian Express (P) Ltd