महाराष्ट्रात आणि देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतं आहे. १ जूनपर्यंत एकूण सात टप्प्यांमध्ये देशात मतदान चालणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी म्हणजेच पुढच्या महिन्यात निकाल लागणार आहे. भाजपाने अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. तर इंडिया आघाडीने असं म्हटलं आहे की यावेळी भाजपा किंवा एनडीएचं सरकार येणार नाही. प्रचारसभा आणि रॅली तसंच मुलाखतींचा धुरळा सुरुच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी येणं अशक्य आहे असं म्हटलं आहे आणि त्यामागचं कारणही सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“इंडिया आघाडीचं सरकार एकाच कारणाने येणार नाही. जे लोक लीडर कोण? याचा निर्णय करु शकत नाहीत त्यांच्या मागे देश कधीही जाणार नाही. आजच्या घडीला किती बेजबाबदार वक्तव्यं ते करत आहेत, त्यांच्या नेत्यांना विचारलं तुमचा नेता कोण? तर ते म्हणतात आमच्याकडे खूप नेते आहेत. तुम्ही कुणाला पंतप्रधान करणार विचारलं तर आम्ही चार-पाच लोकांना पंतप्रधान करु अशी उत्तरं देतात. हा बेजबाबदारपणा आहे. यांना सत्ता राबवायची आहे चालवायची नाही. तसंच अंतर्गत वाद किती आहे बघा. वेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊ शकतात पण त्यांचा एका नेत्यावर विश्वास हवा. एनडीएत जे घटक पक्ष आहेत त्यांना हे व्यवस्थित माहीत आहे की अंतिम शब्द मोदींचा आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा तेच आहेत. यांच्याकडे सगळी इंजिन वेगवेगळ्या दिशांना चालली आहेत. इंडिया आघाडीच्या ट्रेनला डबे नाहीतच.”

हे पण वाचा- “खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोर मुजरा…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्रातलं राजकारण वेगळ्या संक्रमणातून जातं आहे

“महाराष्ट्रातलं राजकारण हे एका वेगळ्या संक्रमणातून जातं आहे. एक स्थिर सरकार, एका पक्षाचं सरकार ही आदर्श आहे. मात्र आत्ता हे नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. अजून काही वर्षे महाराष्ट्रात युती-आघाडीचं राजकारण चालणार आहे. तीन पक्ष एकत्र काम करत असताना सगळ्यांचं सगळं पटेल असं होत नाही. एकाच पक्षात अनेकदा दोघांचं पटत नाही. त्यामुळे तीन पक्ष असताना सगळं काही व्यवस्थित चालेल असं नसतं. पण लीडरशीप महत्त्वाची असते. नेतृत्वाने हा प्रयत्न केला पाहिजे की त्याचा परिणाम तुमच्या गव्हर्नन्सवर होऊ नये. आमचा तो प्रयत्न आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एका पक्षाचं सरकार येऊ नये असं कुणाला वाटत नाही?

“महाराष्ट्रात कुठल्या पक्षाला असं वाटणार नाही की आपल्याच पक्षाचं सरकार येऊ नये? सगळ्याच पक्षांना वाटतं की आपली एकहाती सत्ता यावी. मात्र काही काळ आघाडी-युतीचं राजकारण चालणार आहे. ते अनंतकाळासाठी नाही हे देखील खरं आहे. मात्र पुढच्या काही काळासाठी ते राजकारण चालणार आहे. मी २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे पूर्ण केली ते युतीचं सरकार होतं. आजही एकनाथ शिंदे, मी आणि अजित पवार यांच्यात चांगला संपर्क आहे. आमचा आमचं पक्षांवर व्यवस्थित नियंत्रण आहे. पण तीन पक्ष असल्याने अडचणी येतात, त्या येतीलच, सोडवाव्या लागतील” असं फडणवीस म्हणाले. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India alliance will not come in power after lok sabha election due to this reason says devendra fadnavis scj