पंजाबमध्ये मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच तिथल्या सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेतेमंडळी पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. यासाठी मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला असून त्या वेळी जर फक्त ६ किलोमीटर पुढे भारतीय सैन्य गेलं असतं, तर गुरूनानक देव यांची तपोभूमी भारतात राहिली असती, असं देखील मोदी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिली घटना…देशाची फाळणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशाची फाळणी, १९६५चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१चं बांगलादेश युद्ध या तीन घटनांचा उल्लेख केला आहे. “जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा काँग्रेसचे लोक होते. यांना एवढंही समजलं नाही की सीमेपासून ६ किलोमीटर अंतरावर गुरुनानक देवजींच्या तपोभूमीला (लाहोर) भारतात घेतलं जावं. काँग्रेसच्या लोकांनी पाप केलं आहे. आपल्या भावना दुखावल्या आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.

दुसरी घटना…६५चं युद्ध!

मोदींनी दुसरी घटना १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळची दिली आहे. “१९६५च्या लढाईमध्ये भारतीय सेना लाहोरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या इराद्यानेच पुढे निघाली होती. जर तेव्हा दोन पावलं पुढे गेले असते, तरी गुरुनानक देवजींची तपोभूमि आपल्याकडे असती. दुसरी संधी देखील काँग्रेसनं गमावली”, असं मोदींनी सांगितलं.

तिसरी घटना…बांगलादेश युद्ध!

दरम्यान, तिसरी घटना १९७१ साली झालेल्या बांगलादेश युद्धामधली मोदींनी सांगितली. “बांगलादेशच्या युद्धात ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा दिल्लीत बसलेल्या सरकारमध्ये दम असता, तर ते म्हणाले असते की हे सैनिक तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा आम्हाला गुरुनानक देवजींची तपोभूमि परत मिळेल. तीन-तीन संधी काँग्रेस सरकारनं गमावल्या”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावर देखील निशाणा साधला आहे. “एकानं पंजाबला लुटलं, दुसरा दिल्लीत एकापाठोपाठ एक घोटाळे करत आहे. एकाच माळेचे मणी असूनही आता हे दोन्ही पक्ष पंजाबमध्ये एकमेकांविरोधात असल्याचं नाटक करत आहेत. पण खरं तर हे आहे की काँग्रेस जर ओरिजिनल पक्ष आहे, तर दुसरा त्याची फोटोकॉपी आहे”, असं मोदी म्हणाले.

पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी इतर चार राज्यांसोबतच पंजाबमध्ये देखील मतमोजणी होणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress for lahor during punjab election rally pmw