रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीनंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या भारतीय कसोटी क्रिकेट संघाची निवड अखेर करण्यात आली. आगामी इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी १८ सदस्यीय संघ जाहीर केला. त्यांच्या मुखातून सर्वप्रथम ‘शुभमन गिल…कॅप्टन’ असे शब्द बाहेर पडले. रोहितने ७ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली, तेव्हापासून नव्या कर्णधाराच्या नावावरून विविध तर्कवितर्क बांधले जात होते. अखेर गेल्या कसोटी मालिकेतील उपकर्णधार जसप्रीत बुमराऐवजी गिलला पसंती देण्यात आल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त दोन खेळाडूंचे पुनरागमन, दोघांचा प्रथमच कसोटी संघात समावेश, तर अन्य काही अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्यावरून बरीच चर्चा रंगली. याच भारतीय संघनिवडीचा आढावा.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

कर्णधारपदी गिलला का पसंती?

कर्णधारपदासाठी गिल, बुमरा आणि केएल राहुल या तिघांना प्रमुख दावेदार मानले जात होते. अखेर बुमराच्या तंदुरुस्तीची चिंता आणि राहुलच्या कसोटी कामगिरीत सातत्याचा अभाव, तसेच हे दोघेही तिशीत असल्याने भविष्याचा विचार करून २५ वर्षीय गिलला पसंती देण्यात आली. ”बुमरा आमच्यासाठी खेळाडू म्हणून जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या कार्यभार व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणार आहोत. फिजिओ आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये सर्व सामने खेळणे बुमराला शक्य होणार नाही. त्यामुळे कर्णधारपदासाठी गिल आम्हाला अधिक योग्य वाटला,” असे आगरकर म्हणाले.

गिलला कर्णधारपदाचा कितपत अनुभव?

गिलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये केवळ पाच सामन्यांत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. यापैकी केवळ एक सामना त्याने जिंकला असून दोन सामन्यांत पराभव आणि दोन सामने अनिर्णित अशी त्याची कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला कर्णधार म्हणून पाच ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने भारताचे नेतृत्व करताना पाचपैकी चार सामने जिंकले होते. ‘आयपीएल’मध्ये गतवर्षी प्रथमच गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना गिल अडखळताना दिसला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आधीच्या दोन हंगामांत जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवणारा गुजरात संघ गिलच्या नेतृत्वात आठव्या स्थानी राहिला. मात्र, गिलला या हंगामाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. विशेषतः दडपणाखाली संयम राखून योग्य तो आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची त्याला सवय लागली. याचा त्याला यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात फायदा झाला. तो अधिक परिपक्व नेता म्हणून समोर आला आहे. गुजरात संघाने दिमाखात ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला असून जेतेपदासाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.

फलंदाजीत अनुभवाची कमतरता भोवणार?

विराट (१२३ कसोटी सामने) आणि रोहित (६७) यांची निवृत्ती, तर चेतेश्वर पुजारा (१०३) आणि अजिंक्य रहाणे (८५) यांना पुन्हा डावलण्यात आल्याने भारतीय संघाला फलंदाजीत अनुभवाची कमतरता जाणवणार आहे. यशस्वी जैस्वालने कसोटी पदार्पणापासून जवळपास प्रत्येकच संधीत प्रभावित केले असले, तरी इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. नवनियुक्त कर्णधार गिलची ‘सेना’ देशांतील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) कामगिरी साधारण आहे. इंग्लंडमधील तीन कसोटीत त्याला केवळ १४.६६च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. भारताने केवळ सहा विशेषज्ञ फलंदाजांची निवड केली आहे. यापैकी केएल राहुलने इंग्लंडमध्ये कसोटी शतक साकारले आहे. प्रथमच कसोटी संघात निवड लागलेला साई सुदर्शन आणि सात वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन झालेला करुण नायर यांना कौंटी स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, हे दोघे आणि सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच इंग्लंडमध्ये खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला सर्फराज खान आणि याआधी इंग्लंडमध्ये कसोटी खेळलेला श्रेयस अय्यर यांना संघात स्थान न देणे निवड समितीने पसंत केले. त्यामुळे आजवर भारतीय संघाचे बलस्थान ठरणारी फलंदाजी आता कमकुवत बाजू ठरू शकेल.

पंतवर सातत्यासाठी दडपण?

कसोटी संघात सहा विशेषज्ञ फलंदाज असले, तरी यापैकी चार किंवा पाचच जण अंतिम ११ खेळाडूंत समाविष्ट होणे अपेक्षित आहे. त्यातच कोहलीच्या निवृत्तीमुळे मधल्या फळीत अनुभवाची कमतरता जाणवत असल्याने आता यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतवर अतिरिक्त दडपण असणार आहे. पंत मर्यादित षटकांचे क्रिकेट आणि ‘आयपीएल’मध्ये सातत्याने छाप पाडण्यात अपयशी ठरतो. तरी कसोटीतील त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. पंतने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी एक, तर इंग्लंडमध्ये दोन शतके साकारली आहेत. आगामी दौऱ्यात त्याच्याकडून इतरांच्या तुलनेत अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जाईल.

शमीची उणीव जाणवणार?

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जवळपास दोन वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. २०२३ च्या एकदिवसीय स्पर्धेदरम्यान शमीच्या घोट्याला दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो बराच काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला. त्याने ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांतून यशस्वी पुनरागमन केले. तो इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतही खेळेल अशी आशा होती. त्या दृष्टीने तो मेहनत घेत होता. मात्र, आगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीच्या कसोटी पुनरागमनाच्या प्रयत्नांना काही दिवसांपूर्वी धक्का बसला. त्याच्या चाचण्या करण्यात आल्या आणि तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही. याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारताला १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या मालिकेत बुमराने गोलंदाजीत एकहाती भारताचे आव्हान राखले होते. त्याने ९ डावांत ३२ गडी बाद केले होते. त्यावेळी बुमराबरोबर शमी असता, तर भारताने ही मालिका किमान बरोबरीत राखली असते असे म्हटले गेले. उत्कृष्ट सीम गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शमीची उणीव भारताला ऑस्ट्रेलियात भासली होती. त्याने कसोटी कारकीर्दीत परदेशातील सर्वाधिक कसोटी बळी इंग्लंडमध्ये (१४ सामन्यांत ४२) मिळवले आहेत. त्यामुळे आगामी दौऱ्यातही त्याची कमी भारताला निश्चितपणे जाणवेल.

बुमराला अर्शदीपची मदत?

बुमरासारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज संघात असल्यास अनेक अडचणी दूर होतात. मात्र, त्यामुळे संघाला या गोलंदाजावर अति-अवलंबून राहण्याचीही सवय लागते. तेच भारतीय संघाच्या बाबतीत घडते आहे. ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांत मिळून बुमराने १५१.२ षटके टाकली. याचा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. त्याला पाठदुखीने त्रस्त केले. पुढे त्याला तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब राहावे लागले. आता इंग्लंडमध्ये पुन्हा अशी चूक होऊ नये याची भारतीय संघाला काळजी घ्यावी लागणार आहे. या दौऱ्यासाठी अर्शदीप सिंगचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. अर्शदीपला कौंटी क्रिकेटचा अनुभव आहे. शिवाय तो चेंडू स्विंग करण्यात आणि सलग षटकांचे दीर्घ स्पेल टाकण्यात सक्षम आहे. तसेच या संघात तो एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकेल. अर्शदीपने आतापर्यंत २१ प्रथमश्रेणी सामने खेळताना ६६ गडी बाद केले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता या यशाचे तो कसोटीत अनुकरण करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अष्टपैलू खेळाडूंवर भर…

प्रशिक्षक गौतम गंभीरने पुन्हा अष्टपैलू खेळाडूंवर भर दिला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी शार्दूल ठाकूर आणि नितीश रेड्डी हे वेगवान गोलंदाजी, तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू निवडण्यात आले आहेत. शार्दूल दीड वर्षानंतर कसोटी संघात परतला आहे. जडेजा (८० कसोटी) या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे या दोघांवर अधिक जबाबदारी असणार आहे. जडेजाच्या रूपात एकमेव फिरकीपटू अधिकाधिक सामने खेळणे अपेक्षित आहे. पूर्वी जडेजाची रविचंद्रन अश्विनशी स्पर्धा असायची. मात्र, आता अश्विन निवृत्त झाल्याने जडेजाला फिरकी गोलंदाजीची भिस्त सांभाळावी लागणार आहे. शिवाय सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाज म्हणूनही योगदान द्यावे लागणार आहे. त्याची कामगिरी भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of indian test squad and captain selection for england tour print exp zws