कोकण किनारपट्टीवर यंदा मोसमी पाऊस नेहमीपेक्षा दहा ते पंधरा दिवस आधीच दाखल झाला. याचे कोकणातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम दिसून आले. लवकर आलेल्या पावसामुळे पर्यटन, शेती, फळबागा, मासेमारी यांसारख्या घटकांवर झालेल्या परिणामांचा थोडक्यात आढावा…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

कोकणात पाऊस यंदा लवकर कसा?

साधारणपणे मे महिन्याच्या नैर्ऋत्य मोसमी वारे वाहण्यास सुरुवात होते. १ जूनच्या सुमारास हे वारे केरळमध्ये दाखल होतात. नंतर हळूहळू संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्याने सक्रिय होत जातात. महाराष्ट्रात साधरणपणे ५ जूनच्या सुमारास मान्सून सक्रिय होत असतो. यंदा मात्र २५ मे रोजीच मान्सून कोकणात दाखल झाला. तर २६ मे रोजी मुंबईसह अर्ध्या महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा मोसमी वारे लवकर सक्रिय झाले, त्यांची तीव्रता अधिक असल्याने मोसमी पावसाची वाटचाल वेगवान आणि व्यापक स्वरूपात झाली.

कोकणात किती पाऊस पडला?

कोकण किनारपट्टीवर सलग पाच ते सहा दिवस मोसमी पावसाचा मोठा प्रभाव कोकण किनारपट्टीवर दिसून आला. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना झोडपून काढले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ५०० मिलीमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली. तर रायगड जिल्ह्यातही सरासरी ३०० मिमी पाऊस नोंदवला गेला. मे महिन्यात इतका पाऊस कोकणात कधीही झाला नसल्याचे जाणकार सागंतात.

पावसामुळे नुकसान किती?

किनारपट्टीवरील तालुक्यांना वादळी वारे आणि पावसाचा जोरदार तडाखा बसला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. घरांची आणि सार्वजनिक मालमत्तांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. आरोग्यकेंद्र, स्मशानभूमी, मच्छीमार सोसायटीसारख्या सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान झाले. पाच दिवसात शेकडो वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतुक व्यवस्था बाधित झाली. रस्ते खचणे, दरडी कोसळणे यासारख्या घटनांची नोंद झाली.

पावसाचा परिणाम काय झाला?

लवकर आलेल्या पावसाचा कोकणातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. पर्यटन, मत्स्यव्यवसाय, फळबागा आणि भात शेती यावर याचे परिणाम दिसून आले. कोकणात मासेमारी हंगाम ३१ मे पर्यंत सुरू असतो. १ जून पासून खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. कोकण किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्यास सुरवात झाल्याने, मासेमारी बोटी दहा दिवस आधीच किनाऱ्यावर आणाव्या लागल्या. त्यामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले. समुद्र जेव्हा खळवलेला असतो तेव्हा मासे सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होतात. त्यामुळे या कालावधीत मासेमारी केली तरी त्याचा हाती फारसे काही लागत नाही. हवामानातील बदलांचा फळबागांवरही विपरीत परिणाम दिसून आला. उष्णता, वळीवाचा पाऊस लांबलेली थंडी यामुळे आधीच आंब्याचे उत्पादन यावर्षी सरासरीच्या ३० टक्केच होते. शेवटच्या टप्प्यातील जो आंबा काढणीसाठी शिल्लक होता, त्याला लवकर आलेल्या मोसमी पावसाचा तडाखा बसला. काजूबागांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले.

भाताची पेरणी का रखडली?

कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मे महिन्यात शेतीच्या मशागतीची कामे सुरू असतात. तर रोहिणी नक्षत्र सुरू झाले की शेतकरी पेरणी करत असतात. या नक्षत्रात पडणारा पाऊस जमिनीत योग्य ओलावा पुरवतो. यंदा मात्र रोहिणी नक्षत्रापूर्वीच कोकणात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली. भात खाचरात पाणी साचल्याने पेरणी करणे अवघड अशक्य झाले. आता धूळवाफ्यांऐवजी चिखल पेरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागानेही पावसाचा जोर जास्त असल्याने शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.

पर्यटन व्यवसायाची आर्थिक कोंडी कशी?

कोकणात उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायासाठी हे सुगीचे दिवस असतात. मात्र आधी ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटकांनी आपल्या सहली रद्द केल्या. तर परिस्थिती निवळल्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली तेव्हाच पावसाने कोकणात हजेरी लावली. त्यामुळे पर्यटकांची संख्या पुन्हा रोडावली. समुद्र खवळला असल्याने बोटींग व्यावसायिकांना आपले व्यवसाय लवकर बंद करावे लागले. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला.

सकारात्मक परिणाम कोणता?

लवकर दाखल झालेल्या पावसाने कोकणावरील पाणी टंचाईचे सावट दूर झाले. दरवर्षी साधारणपणे १४ जून ते जून अखेर पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असतो. पण यंदा मे महिन्यातच टँकर बंद करावे लागले. दमदार पावसाने जलाशय, पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पांमधील पाणी पातळी पाच दिवसात ११ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे पाणी टंचाई दूर झाली. जिल्ह्यात ४१ वाड्या आणि २३८ वाड्यांना ४० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. हा पुरवठा आता बंद करण्यात आला आहे.

harshad.kashalkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Early arrival of monsoon rains konkan economy affected print exp asj