आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत धावली. या घटनेला १७१ वर्षे पूर्ण झाली. मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले. परंतु, वर्षानुवर्षे रेल्वे प्रवाशांचे अपघातात होणारे मृत्यू रोखणे प्रशासनाला अद्यापही शक्य झालेले नाही. जानेवारी – मार्च २०२४ या कालावधीत ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यापैकी १३९ प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई उपनगरीय रेल्वेवर ताण का वाढला?

मुंबई शहर व्यापारी केंद्र असल्याने वर्षानुवर्षे नोकरी, रोजगाराच्या शोधात आणि धंदा, व्यवसाय करण्यासाठी नागरिक मुंबई येत आहेत. गेल्या दहा वर्षांत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. मात्र, त्या तुलनेत लोकल सेवेत अंशतः सुधारणा झाल्या आहेत. नोकरदारांना दैनंदिन लोकल प्रवासासाठी फारच धावपळ करावी लागत आहे. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, धावत्या लोकलच्या दरवाजातून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसण्याच्या घटना घडत आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : तापमानवाढीमुळे भाज्याफळांच्या महागाईचे संकट अटळ?

पूर्व-पश्चिम जोड मार्गिका नसल्यामुळे?

मुंबईतील लोकल उत्तर – दक्षिणदरम्यान धावते. मुंबईच्या उत्तर भागात वस्तव्याला असलेले नागरिक नोकरी – व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण भागात येत असतात. गेल्या चार दशकांत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात खासगी कार्यालयांची, व्यवसायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, पूर्व – पश्चिम मुंबईला जोडणारी रेल्वे मार्गिका उभारण्याच्या दृष्टीने कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. वांद्रे – कुर्ला संकुल हे व्यावसायिक केंद्र उभे राहिले असून तेथे मोठ्या संख्येने सरकारी आणि खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे कुर्ला – वांद्रे रेल्वे मार्ग उभारावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र, यावर राज्य आणि केंद्र शासनाकडून कोणतीही सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत. ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ सुरू करून मुंबईचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यात आला. या मेट्रोमधून प्रवास करण्यास प्रवासी पसंती देत आहेत. मात्र, रेल्वेला पर्याय म्हणून मेट्रो व्यवस्था पूरक नसल्याने, तसेच वेग आणि तिकीटदरातील तफावत आदी विविध कारणांमुळे मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासी पुन्हा लोकलकडे वळले. परिणामी, गर्दीचे विभाजन करण्यात यश न आल्याने अपघात होतच आहेत.

अनेक तरुणांचा बळी

गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेवरील डोंबिवली – ठाणेदरम्यान धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये प्रवाशांच्या गर्दीने भरगच्च भरलेल्या लोकलमध्ये आत शिरता न आल्याने २२ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला. चार्मी पासद (२२) हिने डोंबिवलीला लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीमुळे तिला आत जाता आले नाही. त्यामुळे ती लोकलच्या दरवाजावरच लटकून राहिली. डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान चार्मीचा तोल गेला आणि ती खाली पडली. या दुर्घटनेमध्ये तिचा अंत झाला. याच घटनेची पुनरावृत्ती २९ एप्रिल २०२४ रोजी झाली. २६ वर्षीय रिया राजगोरने डोंबिवलीहून सीएसएमटी लोकल पकडली. ती रेल्वेत शिरण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र गर्दीमुळे ती दरवाजाजवळच अडकली. त्यानंतर दिवा – कोपरदरम्यान लोकलचा वेग वाढला आणि तोल जाऊन ती खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तर, मार्च २०२२ मध्ये २२ वर्षीय रतन विश्वकर्मा अंधेरी – नालासोपारादरम्यान प्रवास करीत होता. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने तो दरवाजाजवळ उभा होता. गोरेगाव – मालाड स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गावरील खांबाचा जोरदार धक्का लागल्याने तो लोकलमधून खाली पडला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर, २३ एप्रिल रोजी दिवा-मुंब्रा दरम्यान धावत्या लोकलमधून पडून २५ वर्षीय अवधेश दुबे याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> प्रज्वल रेवण्णांना ब्लू कॉर्नर नोटीस; रेड, पर्पल, यलो अशा सात प्रकारच्या नोटिसांचे अर्थ काय आहेत?

लोकलचे डबे कसे वाढत गेले ?

देशातील पहिली विद्युत रेल्वे १९२५ साली हार्बर मार्गावरील तत्कालीन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्लादरम्यान धावली. त्यानंतर, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर करण्यास २००१ मध्ये सुरुवात झाली आणि २०१६ पर्यंत ते पूर्ण झाले. त्यामुळे उपनगरीय विभागात नऊ डबा लोकलचे रूपांतर १२ डबा लोकलमध्ये करण्यात आले. त्यामुळे प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढली. मात्र, गेल्या १० वर्षांत ठाणे – कल्याण, कल्याण – कसारा, कल्याण – कर्जत या भागांत प्रचंड लोकवस्ती वाढल्याने लोकल सेवेवर ताण वाढला आहे. ही गर्दी कमी व्हावी म्हणून आता १२ डब्यांचे १५ डबे करण्यात येत आहेत. त्यामुळे आणखी ३० टक्के प्रवासी क्षमता वाढेल. परंतु अद्याप मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने १५ डबा लोकल धावू शकलेली नाही. परिणामी, लोकलमधील गर्दीमय प्रवास सुरूच असून गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यात यश आलेले नाही.

मध्य, पश्चिम रेल्वेवर लोकल फेऱ्या किती?

मध्य रेल्वेवर सध्या १,८१० लोकल फेऱ्या धावत असून यामध्ये ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच १५ डब्यांच्या २२ फेऱ्या, १२ डब्यांच्या १,७३२ फेऱ्या धावत आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर दररोज १,३९४ लोकल फेऱ्या धावत असून यात ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या, १२ डब्यांच्या १,१९५ फेऱ्या धावत आहेत. मात्र तरीही लोकलमधील गर्दीचे विभाजन पूर्णपणे झाले नाही.

गतवर्षी किती प्रवाशांचा मृत्यू?

२०२३ वर्षात वेगवेगळ्या रेल्वे अपघातात २,५९० प्रवाशांचा मृत्यू आणि २,४४१ प्रवासी जखमी झाले. २०२३ वर्षात सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले. यापैकी १,२७७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात १,१६८ पुरुष आणि १०९ महिला प्रवाशांचा समावेश आहे. तर, मध्य रेल्वेवर ७८२ आणि पश्चिम रेल्वेवर ४९५ प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडून मृत्यू झाला. तर अशा घटनांमध्ये एकूण २४१ प्रवासी जखमी झाले असून मध्य रेल्वेवरील १४८, तर पश्चिम रेल्वेवरील ९३ जखमींचा त्यात समावेश आहे. लोकलमधील गर्दीचा भार प्रचंड वाढला असून, प्रवासी दरवाज्यावर लटकत धोकादायक प्रवास करीत आहेत. गर्दीच्या लोंढ्यामुळे दरवाज्यावरील प्रवासी बाहेर ढकलले जातात. परिणामी, अनेक प्रवासी धावत्या लोकलमधून पडतात. या प्रकारामुळे २०२३ मध्ये सर्वाधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेवर ७५२ आणि पश्चिम रेल्वेवर ४८९ असे एकूण १,२४१ प्रवासी जखमी झाले. तर, एकूण ५९० प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात मध्य रेल्वेवरील ४३१ आणि पश्चिम रेल्वेवरील १५९ प्रवाशांचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या?

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी सरकते जिने, उद्वाहन (लिफ्ट) यासारख्या सुविधा उपलब्ध करीत आहे. तसेच रेल्वे प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वे प्रशासनाने ‘शून्य मृत्यू’ मोहिमेअंतर्गत कार्यालयीन वेळा बदलण्याबाबतचे निवेदन मुंबई महानगरातील सर्व संस्थांना पाठवले आहे. तर, पश्चिम रेल्वेने ‘शून्य मृत्यू’ मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. परंतु, सर्व प्रवाशांना सामावून घेण्याइतपत लोकल फेऱ्या नाहीत. लोकलची फेऱ्यांची वारंवारता कमी असल्याने गर्दी विभाजित होऊ शकलेली नाही. इतर उपाययोजनाही तोकड्या पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, प्रवासी सहनशीलता दाखवत गर्दीच्या लोकलमधूनच प्रवास करीत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway administration fail to prevent death of passengers in mumbai local train print exp zws