कोल्हापूर : आमदारकीच्या कारकिर्दीत इचलकरंजी विधानसभा मतदार संघ समृद्ध केला आहे. त्याचप्रमाणे एकदाच खासदारकीची निवडणूक लढवून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा विकसित देशाच्या धर्तीवर कायापालट करून हा देशातील आदर्शवत मतदार संघ करायचा आहे. आणि त्यासाठी जनता मला नक्कीच साथ देईल, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी रविवारी व्यक्त केला. विकासाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकभावनेचा आदर करुन मी निवडणूकीत उतरलो असून आपण महायुती अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नसून त्यांच्यासोबत होतो, आहे आणि पुढेही राहणार असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीकडून आज जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात उद्या (१५ एप्रिल) संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना आमदार प्रकाश आवाडे हे उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र आज आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना प्रकाश आवाडे यांनी मंगळवार, १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे असे आवाहन केले.

हेही वाचा : हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र

राहुल ऐवजी मी

आमदार आवाडे म्हणाले, मागील पाच वर्षापासून आपण भाजपाचे सहयोगी सदस्य आहोत. सध्या लोकसभा निवडणूकीसाठी हातकणंगले मतदारसंघात महायुतीने दिलेल्या उमेदवाराबद्दल जनता नाराज आहे. या संदर्भात आपण गोष्टी व आकडेमोड पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली होती. त्यानंतरही उमेदवार बदलला नाही. आपण एकनिष्ठ राहिलो असलो तरी आपल्या जाणूनबुजून काहीजण विरोध करत आहेत. भाजपामध्ये वरिष्ठ पातळीवर आपल्या मानसन्मान दिला जातो. त्यांचा माझ्यावर मोठा विश्‍वास आहे. पण मानसन्मानातून उमेदवारी मिळत नाही तर जनतेतून निवडून येऊन त्यांच्यासोबत जायचे आहे. त्यासाठी जनता आणि पार्टी लेवलची यंत्रणा महत्वाची असते. पण आज आपण भाजपाच्या यंत्रणेत कोठेच नाही आहोत. म्हणूनच मतभेदाचा विषय निर्माण होत चालला आहे. आणि त्यातूनच राहुल आवाडे यांनी सर्वच मतदारसंघाची अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेऊन स्वत:ऐवजी माझी उमेदवारी जाहीर केली.

भाजपशी एकनिष्ठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नानुसार मी इचलकरंजीचा विकास केला आहे. आता विकसित हातकणंगले हा विकासाचा मुद्दा घेऊन मी मैदानात उतरलो असून लढणार आहे. हातकणंगले मतदारसंघ देशात आदर्शवत असा करणार. खासदार काय करु शकतो, केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कसा होऊ शकतो हे आपण दाखवून देऊ. त्यासाठी मी सातत्याने खासदारकीची निवडणूक लढणार नाही, तर जनतेने संधी दिली तर अवघ्या पाच वर्षात आपण आदर्शवत मतदारसंघ करु, असे ते म्हणाले. मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर दौर्‍यावर आले असताना आवाडे यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार अशा विषयाच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र काही मंडळींनी त्याला जाणूनबुजून विरोध केला. पण त्यानंतरही आपण आजपर्यंत भाजपाशी एकनिष्ठच राहिलो आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात; मंडलिक, माने यांचा अर्ज भरताना प्रकाश आवाडेंची उपस्थिती!

आवाडे नको तर दुसरा उमेदवार द्या

शनिवारी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले असताना त्यांच्यासोबत चर्चेतील गोषवारा सांगताना, राहुल आवाडे यांनी त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती आकडेवारीनुसार महायुतीचा उमेदवार कसा अडचणीत आहे, हे त्यांना पटवून दिले आहे. या मतदारसंघातून मोदींना मत मिळायला पाहिजे यासाठी धडपड आहे. ते मत आहे तो उमेदवार निवडून जाणार असा तुम्हाला विश्‍वास असेल तर आमचे काही म्हणणे नाही. पण तुमचाही विश्‍वास नाही असे दिसते. मग त्याच उमेदवारासाठी हट्ट का? निवडून न येणार्‍या उमेदवाराच्या मागे का ताकद लावायची. आवाडे नको असतील तर त्यांना बाजूला ठेवा. जो निवडून येईल त्याला उमेदवारी द्या. आम्हीही त्याच्या मागे राहू. पण येथील खासदार निवडून आला पाहिजे, मोदींना मत मिळायला पाहिजे हाच आमचा आग्रह असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा चर्चा करु असे सांगितले आहे. मी कधीही महायुतीच्या किंवा शिंदे-फडणवीस-पवार यांच्या विरोधात नाही. मी तुमच्यासोबतच आहे आणि राहणार आहे. पण मी बंड केलेले नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ताराराणी पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते. ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, नाना पाटील, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, नरसिंह पारीक, शेखर शहा, प्रशांत कांबळे, आबा पोवार, श्रीरंग खवरे, महादेव कांबळे, के. के. कांबळे, चंद्रकांत इंगवले, महावीर कुरुंदवाडे, सर्जेराव पाटील, रमेश पाटील, अनिल शिकलगार, प्रताप लाखे, नौशाद जावळे, बंडोपंत लाड, राजू माळी, योगेश पाटील, प्रविण केसरे, आनंदा दोपारे, संजय आरेकर, श्रीकांत टेके, मौला मुजावर, राजू गिरी, अविनाश कांबळे, महेश वाणी, सिध्दार्थ कांबळे, यशवंत वाणी, कोंडीबा दवडते, रफिक खानापुरे, दत्तात्रय कुंभोजे, पांडुरंग सोलगे, राजू देसाई, किशोरी आवाडे, उर्मिला गायकवाड, मोसमी आवाडे, नंदाताई साळुंखे, नजमा शेख, सुवर्णा लाड, सपना भिसे, मंगल सुर्वे, सीमा कमते, शबाना शिकलगार, राधिका तराळकर, जयश्री शेलार आदींसह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आवाडे समर्थक उपस्थित होते.