Sharad Pawar on Maharashtra Polls: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. तीनही घटक पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात आली आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी बरेच दिवस बोलणे टाळले होते. पण आता ते निकालाचे विश्लेषण करताना दिसत आहेत. उद्या (८ डिसेंबर) ते सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी या गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. या गावातील लोकांनी पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली होती. आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी विधानसभा निकालासह अजित पवार यांना मिळालेली क्लीन चीट, इंडिया आघाडीतील वाद, अबु आझमी यांचा मविआला सोडचिठ्ठी अशा विविध विषयांवर सडेतोड भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> ‘छोट्या राज्यात विरोधक, मोठ्या राज्यात भाजपा’, शिंदे-अजित पवार गटाच्या मतदानाची आकडेवारी देत शरद पवारांची टीका

मी १४ निवडणूक लढलो, पण…

पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार म्हणाले, “महाविकास आघाडी यापुढील काळातही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते. निवडणुकीला काही पर्याय नसतो. मी आयुष्यात १४ निवडणूक लढलो, मला कधीही पराभव पाहावा लागला नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते. लोकांमध्ये जावे लागते आणि लोक चिंताग्रस्त आहेत, असे आम्हाला दिसते. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. निवडणूक झाल्यानंतर एक उत्साह दिसतो, तो मात्र यावेळेला दिसत नाही.”

हे ही वाचा >> Uttamrao Jankar: मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आमदारकी सोडणार, शपथविधीच्या दिवशीच उत्तमराव जानकरांची मोठी घोषणा

निकालाबाबत पुढे बोलत असताना शरद पवार यांनी हेही स्पष्ट केले की, ईव्हीएमवर आमची शंका नाही. कारण त्यासंबंधी ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत. पण मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत. शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on maharashtra assembly election result says i won 14 election but this time we lost kvg