पुणे : तिसऱ्या सामन्यातील इंग्लंडच्या विजयामुळे रंगत कायम राहिलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील चौथा सामना आज, शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होईल, तेव्हा फलंदाज आपली कामगिरी उंचावतील अशी अपेक्षा भारतीय संघ आणि चाहते करतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परदेशात वेगवान आणि मायदेशात फिरकी गोलंदाजांवरच अवलंबून राहणे भारतासाठी मारक ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि त्यापूर्वी मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांना आलेले अपयश विसरता येणारे नाही. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत विजय मिळविले असले, तरी ते एखाद्या फलंदाजाच्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावरच होते.

पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा, तर दुसऱ्या सामन्यात तिलक वर्मा यांनी आपली बॅट परजली होती. दुसऱ्या सामन्यात तिलकला कुणाचीच साथ मिळाली नव्हती. संजू सॅमसन, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या प्रमुख फलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही. रिंकू सिंग आणि नितीश कुमार रेड्डी जायबंदी आहेत. त्यामुळेच फलंदाजांचे अपयश आणि तंदुरुस्ती अशा दुहेरी आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाची मैदानाबाहेरच अधिक धावपळ होत आहे.

दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांत इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूने फलंदाजीत योगदान दिले आहे. गोलंदाजीतही जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, लियाम लिव्हिंगस्टोन आपले काम चोख करत आहेत. फिरकीचे फार पर्याय नसले तरी रशीदने मधल्या षटकांत भारतीय फलंदाजांवर ठेवलेला अंकुश संघ व्यवस्थापनाला विचार करायला लावणारा आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावरील खेळपट्टीने कायम फलंदाजांना साथ दिली आहे. भारतीय फिरकी या मालिकेत यशस्वी होत असली, तरी इंग्लंडच्या फलंदाजांनी ‘आयपीएल’मधील अनुभव प्रत्येक सामन्यात पणाला लावला आहे. त्यातही कर्णधार बटलरची कामगिरी फार प्रभावी ठरत आहे. आता पुण्यातील फलंदाजीसाठी आदर्श अशा खेळपट्टीवर बटलर पुन्हा चमक दाखवतो का , हे पाहणे रंजक ठरेल.

सूर्यकुमार धावांच्या प्रतीक्षेत

क्रिकेटच्या ट्वेन्टी-२० या लघुत्तम प्रारूपात सातत्य दाखवलेल्या संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना सध्याच्या मालिकेत येत असलेले अपयश भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. आक्रमक सुरुवात केल्यावर डावाचा वेग कसा कमी-जास्त करायचा हेच या मालिकेत भारताला गवसलेले नाही. त्यात डाव्या-उजव्या फलंदाजांच्या समन्वयाचा प्रयोगही फसत आहे. विशेषत: सूर्यकुमारने धावांची प्रतीक्षा संपविणे गरजेचे आहे. कर्णधाराला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धची मालिका मिळून गेल्या सहा ट्वेन्टी-२० डावांत एकही अर्धशतक करता आलेले नाही. गोलंदाजीत आता मोहम्मद शमीचा दिलासा मिळत असला, तरी धावा रोखणे आणि बळी मिळविण्याचे काम सातत्याने वरुण चक्रवर्तीच करत आहे. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि अभिषेक शर्मा या फिरकीपटूंच्या कामगिरीत सुधारणेला वाव आहे.

रिंंकू सिंग तंदुरुस्त असून, चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांचा प्रयोग हा संघ नियोजनाचा भाग होता. सूर्यकुमार यादवकडून धावा होत नसल्या तरी त्याच्यासारख्या फलंदाजाला आपली जुनी लय पुन्हा मिळविण्यासाठी एक मोठी खेळीही पुरेशी ठरते. रायन टेन डोएशहाते, भारताचे साहाय्यक प्रशिक्षक.

● वेळ : सायं. ७ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 4th t20i match today in pune sports news amy