ICC World Cup 2023: आयसीसीने नुकतेच एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. भारतातील या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. त्याचवेळी यजमान भारत ८ ऑक्टोबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा या स्पर्धेत पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. आगामी विश्वचषकात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध पहिला सामना खेळणे रोहित ब्रिगेडसाठी फायदेशीर असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
पहिला सामना २०१९च्या अंतिम फेरीतील संघ इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडिया ८ ऑक्टोबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेपॉक येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळल्याने टीम इंडियाला फायदा होईल, असे मत लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, “तुम्ही कमकुवत संघ जर कधी पहिला सामना खेळण्यासाठी निवडला असता तर तुमची ताकद तुम्हाला दाखवता आली नसती.”
दरम्यान, ७३ वर्षीय गावसकर म्हणाले की, “नॉकआऊट सामन्यात ऑस्ट्रेलियाशी सामना करणे भारतासाठी आव्हानात्मक असेल.” गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “नक्कीच, जर तुम्हाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाविरुद्ध विजय मिळवण्याची गरज पडली असती तर ते कठीण झाले असते. मला वाटते की सुरुवातीला चांगल्या संघांविरुद्ध खेळणे नेहमीच फायदेशीर असते. पहिल्या सामन्याचा निकाल चांगला लागला नसला तरी भारताला स्पर्धेत टिकून राहण्याची अधिक संधी असेल,” असे ते पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “जर विरोधी संघ कमकुवत असेल तर टीम इंडियाला त्याच्याविरुद्ध संघात बदल काय करायचे ते कळेल. संघाची बेंच स्ट्रेन्थ चेक करता येईल.”
दिग्गज खेळाडू गावसकर म्हणाले, “जर तुम्हाला चांगला निकाल मिळाला नाही, तर तुम्हाला नंतर संधी आहे. तुम्ही नंतर एखाद्या कमकुवत संघाविरुद्ध खेळलात, तरी तुम्हाला त्यांच्याविरुद्ध काय करावे लागेल आणि कोणत्या फरकाने जिंकायचे आहे हे तुम्हाला कळेल.” १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाची आठवणही त्यांनी सांगितली. गावसकर पुढे म्हणाले, “आम्ही १९८३ मध्ये पहिला सामना खेळला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध, त्यावेळी ते गतविजेते होते आणि आम्ही त्यांना हरवले. पावसाने हस्तक्षेप केल्यामुळे सामना दोन दिवस चालला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळ सुरू झाला. त्या विजयाने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला. कारण तोपर्यंत आमची विश्वचषकातील कामगिरी काही खास नव्हते. तोपर्यंत आम्ही एकही सामना जिंकला नव्हता.”
शेवटच्या तीन साखळी सामन्यांपैकी दोन सामने क्वालिफायर्सविरुद्ध होतील
रोहित शर्मा अँड कंपनी विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या तीन साखळी सामन्यांपैकी दोनमध्ये पात्रताधारकांशी भिडतील. स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांना काही पराभव पत्करावे लागले तर त्यामुळे त्याला पुनरागमनाची संधी मिळू शकते. २०२३च्या विश्वचषकासाठी पात्रता सामने झिम्बाब्वेमध्ये खेळले जात आहेत. वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे सारखे संघ या स्पर्धेचा भाग आहेत. दोनवेळचा चॅम्पियन कॅरेबियन संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.