IPL 2025 MI vs PBKS Eliminator: आयपीएल २०२५च्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत असणार आहे. अजूनही या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी मुंबई, पंजाब आणि आरसीबी हे तीन संघ शर्यतीत आहे. आरसीबीचा संघ पहिला क्वालिफायर सामना जिंकत अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान दुसरा क्वालिफायर सामना पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स यांच्यात आज म्हणजेच १ जूनला होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सबाबत आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.
स्पर्धेच्या सुरूवातीला मुंबई इंडियन्सचा संघ अगदी तळाशी होती. पण यानंतर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत थेट प्लेऑफ गाठलं आणि आता संघ अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान, आर अश्विनने एक लक्ष वेधून घेणारा प्रश्न विचारला आहे. अश्विन म्हणाला की मुंबई इंडियन्सला इतकी नशीबाची साथ कशी मिळते? याचबरोबर अश्विनने इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सविरूद्ध खेळताना रोहित शर्माला दोन वेळा जीवदान मिळालं आणि त्यानंतर याचा फायदा घेत त्याने मॅचविनिंग ८० धावांची खेळी केली. त्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटमधून धावा येणं मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरलं आणि परिणामी मुंबईने तो सामना जिंकला. हाच मुद्दा उचलत अश्विनने २०१८ मधील प्रसंगही सांगितला आहे.
अश्विनने मुंबईच्या नशीबावर बोलताना २०१८ च्या हंगामातील प्रसंग सांगितला. अश्विन म्हणाला, “२०१८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब यांच्यात खेळला जात होता. मी त्यावेळी पंजाबचा कर्णधार होतो. मुंबई इंडियन्सची अवस्था १३ षटकांत८० धावांवर ५ बाद अशी होती. ते लोक सामन्यात कुठेच नव्हते. अचानक वीज जाते आणि फ्लडलाइट्स बंद पडतात. त्यामुळे सामन्यात २० मिनिटांचा ब्रेक येतो. यानंतर जेव्हा सामना पुन्हा सुरू होतो तेव्हा कायरन पोलार्ड वादळी फटकेबाजी करतो आणि संघ त्या सामन्यात १८०-२०० धावा केल्या.”
आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना अश्विन पुढे म्हणाला, “मुंबई इंडियन्सचं नशीब नेहमीच बलवत्तर असत. कधी कधी नशीबाची मिळते खरी. पण मुंबई इंडियन्सच्या बाबतीत नेहमीचं हे घडत. मुंबई इंडियन्सने एवढं कसं काय नशीब काढलंय हे शोधायला हवं.”
मुंबई इंडियन्स पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनणारा पहिला संघ आहे. चेन्नई सुपर किंग्जसह सर्वाधिक वेळा ट्रॉफी उचलण्याचा विक्रम या संघाच्या नावावर आहे. आता मुंबई इंडियन्स जेतेपद पटकावण्याचा षटकार लगावणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.