Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (२८ फेब्रुवारी) भारतीय खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली. बीसीसीआयने एकूण ३० खेळाडूंचा करार यादीत समावेश केला आहे. ए+ श्रेणीमध्ये चार खेळाडूंना, ए मध्ये सहा, बी श्रेणीमध्ये पाच आणि सी श्रेणीमध्ये सर्वाधिक १५ खेळाडूंना स्थान मिळाले आहे. खेळाडूंसोबत हा करार ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंतचा आहे. बीसीसीआयच्या या केंद्रीय करारावर माजी क्रिकेटपटून इरफान पठाणने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इरफानने हार्दिक पंड्याबद्दल उपस्थित केला प्रश्न –

केंद्रीय कराराची मोठी गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना त्यात स्थान मिळालेले नाही. दोन्ही खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे वगळण्यात आले आहे. आता माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारात न सामील करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. बीसीसीआयवर निशाणा साधत इरफान पठाण म्हणाला की हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंसाठी हे प्रमाण का नाही. उल्लेखनीय आहे की बीसीसीआयने इशान आणि श्रेयसचे केंद्रीय करार रद्द केले, तर २०१८ पासून एकही कसोटी न खेळलेल्या पंड्याला ग्रेड-ए करारात सामील केले आहे.

इरफान पठाणने एक्सवर लिहिले, ‘इशान किशन आणि श्रेयस अय्यर प्रतिभावान क्रिकेटर आहेत आणि आशा आहे की ते जोरदार पुनरागमन करतील. हार्दिक सारख्या खेळाडूला कसोटी क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेटला अपेक्षित परिणाम साधता येणार नाहीत.’

हेही वाचा – IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा सोडल्यानंतर इशान किशन झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी आला नव्हता. त्याने आयपीएलची तयारी सुरू केली, ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. बडोद्याविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी श्रेयस अय्यरही मुंबई संघात सामील झाला नाही. तर कंबरेच्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाबाहेर होता.

हेही वाचा – श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?

कोणाला किती रुपये मिळणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वेगवेगळ्या श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी ठराविक रक्कम मानधन म्हणून देतं. त्यानुसार ए+ श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी सात कोटी रुपये दिले जातात. ए श्रेणीतल्या खेळाडूंना पाच कोटी, बी श्रेणीतल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि सी श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी एक कोटी रुपये दिले जातात. जे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नियमितपणे खेळत असतात त्यांचाच ए प्लस श्रेणीत समावेश केला जातो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irfan pathan asked bcci if hardik does not participate in redball should not he play white ball cricket if not on national duty vbm