Ajit Agarkar On Shreyas Iyer, Ind vs Eng: इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. २० जूनपासून दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ पहिल्यांदाच विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय जाणार आहे. या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर काही अनुभवी खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. बीसीसीआयने घेतलेला सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे, श्रेयस अय्यरला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

फलंदाजीत सातत्य काय असतं, हे श्रेयस अय्यरने ग्रीस काही वर्षांत दाखवून दिलं आहे. आयपीएल, वनडे क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने त्याचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या समावेश केला. पण कसोटी संघात त्याला स्थान दिलेलं नाही. त्याची गेल्या काही महिन्यांची कामगिरी पाहिली तर, त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळायला हवी होती. पण असं झालेलं नाही. दरम्यान मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाले अजित आगरकर?

संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अजित आगरकर म्हणाले, “ श्रेयसने वनडे क्रिकेटमध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी ) दमदार कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. पण आता कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी जागा नाही.” याचा अर्थ असा होतो की, सध्या कसोटी संघात त्याची गरज नाही.

श्रेयस अय्यरने वनडे क्रिकेटसह कसोटी संघातही आपलं स्थान निर्माण केलं होतं. पण दुखापतीचं ग्रहण लागल्याने त्याला आपलं संघातील स्थान गमवावं लागलं. मात्र, कमबॅक केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. त्यानंतर मुंबईला रणजी ट्रॉफी, इराणी कप आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. त्याची ही कामगिरी पाहता, त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळणार हे जवळजवळ निश्चित होतं, पण असं झालेलं नाही.

इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव