डॉ. जाह्नवी केदारे
‘केवढे वजन वाढले आहे माझे? माझे पोट एवढे कधीच सुटलेले दिसत नसे! आता म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घालायाचीसुद्धा लाज वाटायला लागली आहे’, असे उद्गार चाळीशीतल्या स्त्रीच्या तोंडी सर्रास सहजपणे असतात.
हल्ली साधारण १३-१४ वर्षापासूनच सर्वजण, विशेषतः मुली आणि स्त्रिया आपल्या वजनाविषयी जागृत होतात. आरशासमोर उभे राहून आपण जाडे तर दिसायला लागलो नाही ना? असे आपल्या आईला चर्चा करताना पाहिले की अपोआपच वयात येणाऱ्या मुलीही आपल्या वजनाची चिंता करू लागतात. त्याचप्रमाणे जाहिरातीतील मॉडेल्स, करीनाचा साईझ झीरो याचाही त्यांच्या मनावर परिणाम होतो. किशोरावस्थेत होणारे बदल वयात येणाऱ्या मुलीला आपल्या शरीराची नव्याने जाणीव करून देतात, त्याचवेळेस आपल्या वजनाविषयीची तिची जाणीव बदलू लागते. कॉलेजमध्ये नवीन वातावरणाशी, नवीन मुलामुलींशी ओळख होत असताना आपले जाड- बारीक असणे मुलींच्या दृष्टीने महत्वाचे ठरू लागते. त्यातूनच डाएट, जिम असे सगळे प्रकार सुरू होतात.
आपले वजन जास्त आहे आणि आपण स्थूल आहोत की नाही हे तपासून पाहण्याचे वेगवेगळे दंडक वापरले जातात. Body mass index(BMI), waist to hip ratio आणि शरीरातील चरबीचे प्रमाण हे त्यातील काही. यांचा वापर करून मुली आणि स्त्रिया पुन्हा पुन्हा आपण स्थूल आहोत हे मनाला सांगू लागतात आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. विशेषतः तरुण मुलींमध्ये स्थूलपणाच्या भावनेमुळे आत्मविश्वास कमी होतो, स्वतःविषयी, प्रेम वाटत नाही. कपडे निवडताना, चालताना, कोणतेही शारीरिक काम करताना आपण कसे स्थूल दिसतो याचाच सतत मनात विचार सुरू होतो. कधी कधी यातून एकटेपण येते, इतरांमध्ये मिसळणे कठीण होते. आपल्याच नजरेतून आपण अशा प्रकारे उतरलो की मन उदास होते, निराश होते. नको असे ‘स्थूल शरीर’ असे प्रकर्षाने वाटू लागते. क्वचित प्रसंगी जीवनही नकोसे होते.
हेही वाचा : Health Special : मेथी एवढी का महत्त्वाची?
आपण स्थूल होऊ ही भीती सतत मनात बाळगणे, त्यासाठी नको तेवढी उपासमार करणे, कधी पुरेसे खाल्ले तर अत्यंत अपराधी वाटणे आणि मुद्दाम उलट्या करून खाल्लेले सर्व बाहेर टाकून देणे असा Anorexia nervosa नावाचा मानसिक विकार आढळतो. त्याचप्रमाणे काही तरुण मुलींमध्ये Bulimia nervosa हा मानसिक विकार दिसून येतो. यात एखाद्यावेळेस अति खाणे, मग त्याविषयी अपराधीपणाची भावना निर्माण होणे आणि मग रेचके वापरणे असे दिसून येते.
अशा प्रकारे आपल्या वजनाविषयी जाणीव निर्माण झाली की ते कमी करण्याचे सर्व प्रयत्न सुरू होतात. मुख्य म्हणजे डाएट सुरू होते. काय, किती आणि कधी खायचे यावर निर्बंध येतात. आपल्या चवीढवी दूर ठेवून सांगितल्याप्रमाणे खाऊन किंवा न खाऊन वजन कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आटापिटा केला जातो.
अनेक स्त्री पुरुष आपल्या उंचीला योग्य अशा वजनापर्यंत पोहोचण्याचा सतत प्रयत्न करत असतात. वजन त्या कक्षेच्या थोडेसे जरी बाहेर गेले तरी अस्वस्थ होतात. सातत्याने डाएट करण्यातून अनेक शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. शरीरातील अन्तःस्रावांवर परिणाम होतो. त्यामुळे स्त्रियांच्या पाळीवर परिणाम होऊ शकतो. हृदयावर परिणाम होऊ शकतो, हाडे ठिसूळ होतात. शरीराची एकूण क्षमता कमी होते. अनिमिया होतो.
वजन कमी होऊ लागले की अर्थातच आनंद होतो. लोकही कौतुक करू लागतात, मित्रमैत्रिणीमध्ये आपले स्थान उंचावते. आपण सुखावतो. आपल्यालाही हलके आणि चपळ वाटते. आपला आत्मसन्मान वाढतो, आत्मविश्वास वाढतो. वजन कमी केले की असे अनेक चांगले परिणाम होतात. पण मग आपण डाएट थांबवतो. लक्षात येते की थोड्याच काळात आपण खूप खायला लागलो आहोत. कधी कधी रात्री अपरात्रीसुद्धा! अनेक गोड आणि तेलकट पदार्थ खायला आपल्याला आवडते आहे. आपले वजन पुनः वाढू लागते. पुनः मनात निराशा निर्माण होते आणि पुनः नवीन डाएट करण्याच्या आपण मागे लागतो. कमी खाणारे लोक सतत खाण्याच्या वस्तूंचा, विविध पाक कृतींचा विचार करताना आढळतात. त्यांच्या चर्चेतही ‘खाणे’, ‘हेल्दी फूड्स’, ‘डाएट फूड’ हा प्रमुख विषय बनतो. फावल्या वेळात टीव्ही बघताना , इंटरनेटवर याच विषयाची माहिती घेणे सुरू असते.
अति कमी खाणाऱ्यांमध्ये उदासीनता, अतिचिंता याचे प्रमाण आढळून येते. याबरोबरच अनेकांच्या बाबतीत दिसून येणारी गोष्ट म्हणजे ताणतणाव वाढला की काही लोकांचे खाण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः सततचा ताण असेल, कामाचा, घरातल्या आजारपणाचा इ. तर त्याचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे अक्षरशः खात सुटणे. अशा वेळेस गोड, तेलकट अशा गोष्टी खाल्ल्या जातात आणि त्याही प्रमाणाबाहेर. अशा काळात वजन अचानक वाढू लागते. तणावाच्या परिस्थितीत शरीरातल्या अन्तःस्रावांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे खायची इच्छा होते आणि ताण तणावावरचा उपाय म्हणून त्याचा वापर केला जातो.
याचा अर्थ स्थूल व्यक्तींनी वजन कमीच करायचे नाही की काय?
अर्थातच असे नाही. पण स्थूलपणाची कारणे काय आहेत हे महत्त्वाचे. एखाद्या कुटुंबात सगळेच स्थूल असतात. अनुवांशिक गुणधर्माच तो. अशा व्यक्तीने वजन कमी करताना लक्ष्य निश्चित करताना वास्तववादी असले पाहिजे. वातावरणातील अनेक घटक उदा. कामाचे स्वरूप, खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. कामाच्या जागी अनेक मीटींग्ज, त्यात उत्तम प्रतीचे खाणे आणि ‘पिणे’ सुद्धा असले की आपोआप वजन वाढीस लागते. दिवसभर केवळ बसून काम आणि शरीराला काहीच हालचाल नाही असे असेल तर वजन नक्कीच वाढते. हृदयाचे विकार, अतिरक्तदाब, मधुमेह असे विकार होऊ नयेत यासाठी किंवा झाल्यावर स्थूलपणा कमी करावा लागतो. संधिवात टाळण्यासाठीही वजन नियंत्रणात असावे लागते.
या सगळ्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कायमस्वरूपी बदल घडवणे आवश्यक असते. उदा. तेलकट पदार्थ रोजच्या जेवणात नसणे. त्याचबरोबर आपल्या पोषणासाठी आवश्यक सर्व खाणेही गरजेचे. केवळ खाणेपिणे नियंत्रणात असून पुरेसे नाही. व्यायाम, शारीरिक हालचाल यांचाही विचार महत्त्वाचा. ताणतणाव कमी करण्यासाठी मित्र मैत्रिणीकडे मन मोकळे करणे, फिरायला जाणे, छंद जोपासणे, योग, प्राणायाम, ध्यान करणे या सगळ्याचा उपयोग होतो. त्यामुळे वजनाचा काटा आपल्या मनात आपल्या जीवनशैलीचे प्रतिबिंब बनला तर आयुष्य अधिक निरोगी बनेल!