Health Special सुश्रुतसंहितेने हेमंत ऋतूमध्ये अहिम भोजन योग्य असा सल्ला दिलेला आहे, तर त्याविषयी समजून घेऊ. हिम म्हणजे थंड आणि अहिम म्हणजे थंड नसलेले, तर हिवाळ्यात थंड नसलेले असे भोजन घ्यावे. याचा अर्थ हिवाळ्यात शरीरामध्ये गारवा वाढलेला असताना गरम अन्नपदार्थांचे सेवन करावे हा तर आहेच, अर्थात जेवताना अन्न गरम असावे असा होतोच. त्याशिवाय या दिवसांत कदापि, थंड आहार सेवन करु नये हा सुद्धा अर्थ होतो. पण असे का, ते आता समजून घेऊ!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा:

जठराचे तापमान

थंड झालेल्या भोजनामुळे शरीरामध्ये गारवा वाढण्याची शक्यता आणि महत्त्वाचं म्हणजे थंड भोजन पचायला कठिण असल्याने हा सल्ला दिलेला आहे. सर्वसाधारणतः जठराचे तापमान ९९.६ अंश फॅरनहाईट इतके असते, जे थंड आहार घेतल्यावर घटते. त्यामुळे अन्नाचे घुसळण, सूक्ष्म कणांमध्ये रुपांतर, त्यावर पाचक स्त्रावांची प्रक्रिया या सर्व क्रिया बिघडतात, अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही आणि अन्नाचे व्यवस्थित पचन नाही म्हणजे अस्वास्थ्याची आणि विविध रोगांची सुरुवात हे तर सरळ गणित आहे.

हेही वाचा:

थंड पाण्याचे परिणाम

आज दुर्दैवाने कामकाज, नोकरी, धंदा, व्यवसाय वगैरे कारणांमुळे अनेकांना गरम जेवण मिळत नाही आणि थंड जेवण जेवावे लागते हे दुर्दैवच म्हणायला हवे. ही स्थिती बदलण्याचे प्रयत्न त्यांनी करावे, त्याशिवाय हिवाळा असतानाही थंड आईस्क्रीम खाणार्‍या, चील्ड बीअर पिणार्‍या, शीतपेये वा थंडगार पाणी पिणार्‍या मंडळींनी त्या गार अन्नपदार्थांमुळे स्वास्थ्यावर किती विपरित परिणाम होत असेल याचा विचार करावा.

हेही वाचा:

एकंदरच आयुर्वेदाने थंड आहार स्वास्थ्यासाठी अहितकर सांगिला आहे, तर याच निमित्ताने समजून घेऊ आयुर्वेदाने सांगितलेले थंड भोजनाचे दोष.

थंड आहाराचे दोष (काश्यपसंहिता ७.७.३३)

  • पोटदुखी- शीत पदार्थांचे पचन सुलभ नसल्याने अपचन होऊन पोटदुखी होण्याची शक्यता
  • ग्रहणीच्या पचनक्रियेमध्ये बिघाड- आयुर्वेदाने ग्रहणी म्हणजे लहान आतड्याचा जठरानंतरचा सी आकाराचा भाग हे अग्नीचे स्थान सांगितले आहे.थंड पाण्यामुळे ग्रहणीचे अन्नपचनाचे कार्य बिघडते.
  • खोकला- थंड पाणी वा थंड पदार्थांचा स्पर्श हा घशाला सूज निर्माण करुन कोरड्या खोकल्यास कारणीभूत होतो.
  • उचकी – थंड पदार्थांचा स्पर्श हा जठराला व पर्यायाने जठराशी संबंधित वॅगस नर्व्हला उद्दिपित करुन उचकीचे कारण होऊ शकतो.
  • कफ वाढणे- पाण्याचे रेणू आणि त्यातही थंड पाण्याचे रेणू हे थंड गुणांचा कफ शरीरात वाढवतात.
  • वात वाढणे- थंड पदार्थ शरीरामध्ये थंडावा वाढवतात जो थंड गुणाचा वात वाढवतो.याशिवाय थंड आहार न पचल्याने शरीराला पोषक आहाररस तयार होत नाही. हा रसक्षय (रसाची कमतरता) सुद्धा वात वाढवण्यास कारणीभूत होते.
  • शिर व नेत्र ग्रह- वात वाढल्यामुळे डोके-डोळे जड होणे
  • गल ग्रह- थंड पदार्थांमुळे घसा धरणे.
  • मल व मूत्र जडत्व व वृद्धी – थंड पदार्थांचे पचन व्यवस्थित न झाल्याने शरीराला आहारातला सत्व भाग कमी मिळतो आणि त्यापासून तयार होणारे मल व मूत्र हे त्याज्य पदार्थ मात्र अधिक प्रमाणात तयार होतात,ज्यामुळे मल व मूत्राचे प्रमाण वाढून ते जड होतात.
  • अरोचक- अरुची म्हणजे जिभेवरची चव जाणे, जे अपचनामुळे संभवते आणि थंड आहाराप्रति शरीराचा विरोध सुद्धा दर्शविते.
  • घृणा – अन्नसेवनाप्रति घृणा निर्माण होणे

महत्त्वाचे- थंड पाणी हे गर्भार स्त्रियांसाठी वर्ज्य (निषिद्ध) असल्याचे महर्षि काश्यप सांगतात. (काश्यपसंहिता ८.२३.१८)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why one should not have cold food what are its ill effects ayurveda hldc vp70